Pune News : तालुक्यातील नीरा देवघर धरण रिंग रोडवरील शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम डोंगरी भागातील कुडली बुद्रुक आणि खुर्द येथील कापणी केलेल्या रचून ठेवलेल्या नाचणी व वरई पिकांचे मॉन्सूनोत्तर पावसाने नुकसान झाले आहे. दुर्गम भागातील नुकसानीची पाहणी आणि पंचनामे कृषी सहायक योगेश अंभोरे यांनी गुरुवारी (ता. ३०) केले.
कुडली खुर्द येथील १० तर कुडली बुद्रुक येथील २० शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन गुरुवारी पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांकडून तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
पावसात भिजल्यामुळे नाचणी व वरईचा दाणा काळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तर काही दाण्यांना पुन्हा कोंब फुटल्याने नुकसान झाल्याचे शेतकरी गेणबा कंक व सखाराम कंक यांनी सांगितले.
हिरडस मावळात भात पिकांबरोबरच नाचणी व वरईचे पीक घेतले जाते. या पिकातून मिळालेल्या उत्पादनातून या भागातील शेतकऱ्यांची वर्षभराची उपजीविका अवलंबून असते. परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा या भागातील शेतकऱ्यांना नेहमीच सामना करावा लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील डोंगराचा भाग वाहून आल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरत असतानाच पावसामुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.