
Latur News : यंदाच्या पावसाळ्यात पन्नास लाख वृक्षांची लागवड करुन १९ जुलै या एकाच दिवशी वीस लाख वृक्षांची लागवड करण्यासाठी बाजूच्या धाराशिव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची लगीनघाई सुरु आहे. तर एक कोटी ४० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतलेल्या लातूर जिल्ह्यात मात्र वृक्ष लागवडीसाठी स्मशान शांतता आहे.
वटपौर्णिमेनिमित्त साडेचार हजार वडाची झाडे लावून वन विभागाने वृक्ष लागवड मोहिमेचा प्रारंभ केला असला तरी लाखो वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असलेल्या जिल्हा परिषदेसह अन्य विभागांकडून अजून काहीच हालचाली नाहीत. यामुळे वनक्षेत्रात राज्यात खालून पहिला असलेल्या लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठीच्या उदासीनतेबद्दल वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमीमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असले तरी त्याच्या वाढीसाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्याची स्थिती आहे. दरवर्षी पावसाळ्यातच वृक्ष लागवडीची चर्चा होते. त्यानंतर वर्षभर त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. वनक्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी सर्व सरकारी यंत्रणांना उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार यंत्रणाकडून पावसाळ्यातील काही दिवस प्रयत्न केले जातात. त्यानंतर लागवडीकडे व लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाचा यंत्रणांना विसर पडतो.
गेल्या वर्षी जिल्ह्यात एक कोटी ४० लाख ५८ हजार दोनशे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १४ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत यंदाही हेच उद्दिष्ट कायम ठेवण्यात आले असून त्यानुसार वृक्ष लागवड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. पावसाळा लवकर सुरु झाला तरी किमान लागवडीसाठीही यंत्रणांनी पुढाकार घेतलेला नाही.
वन विभागाने वडाच्या झाडाची लागवड करुन मोहिमेला प्रारंभ केला. त्यानंतरही यंत्रणा हातावर हात ठेवूनच आहेत. वनक्षेत्र कमी असलेल्या बाजूच्या धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पन्नास लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट तडीस नेण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून चळवळ उभी केली आहे. रोपांच्या उपलब्धतेसोबत १९ जुलै या एकाच दिवशी वीस लाखाची वृक्ष लागवड करण्यासाठी त्यांनी यंत्रणांना कामाला लावले आहे.
समाजातील सर्व घटकांना या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. धाराशिवमध्ये पन्नास लाख वृक्ष लागवडीसाठी सुरू असलेली लगीनघाई पहाता एक कोटी ४० लाखाचे उद्दिष्ट असूनही लातूर जिल्ह्यात काहीच हालचाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धाराशिवच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात कमी वनक्षेत्र आहे.
तरीही वृक्ष लागवडीसाठी असलेली सरकारी यंत्रणांची उदासीनता धक्कादायक असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे या काही दिवसापासून प्रशिक्षणासाठी गेल्यामुळेही वृक्ष लागवड मोहिमेवर परिणाम झाला आहे. त्या ११ जुलैला परत येणार असून त्या आल्यानंतर वृक्ष लागवडीला वेग येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रमुख सरकारी यंत्रणांचे उद्दिष्ट
जिल्हा परिषद ५२ लाख ५८ हजार ४८८
रेशीम विभाग ३७ लाख ३३ हजार ४७१
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी १४ लाख १२ हजार ३००
वन विभाग ६ लाख २२ हजार ५००
नगरपालिका व नगरपंचायती ५ लाख ८२ हजार ३६५
कृषी विभाग, जिल्हा परिषद ५ लाख
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग ४ लाख ६२ हजार
सामाजिक वनीकरण ३ लाख ४६ हजार
महानगरपालिका लातूर १ लाख ८४ हजार
जलसंपदा विभाग एक लाख २५ हजार
रोजगार हमी योजना ५० हजार २००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.