Dam Storage : मराठवाड्यात केवळ ४० टक्के पाणीसाठा; राज्यातील धरणेसाठा १५ टक्क्यांनी आटला

Dam Water level : यंदा पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील पाणीस्थिती यंदा बिकट असून, ९२० धरणांत १०३ टीएमसी म्हणजे केवळ ४०.४३ टक्के पाणीसाठा आहे
Dam Storage
Dam StorageAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील लहान, मध्यम व मोठ्या अशा एकूण दोन हजार ९९४ प्रकल्पांत ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा ९०.०२ टक्के होता. त्या तुलनेत यंदा त्यात जवळपास १५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यातही मराठवाड्यातील पाणीस्थिती यंदा बिकट असून, ९२० धरणांत १०३ टीएमसी म्हणजे केवळ ४०.४३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हाच साठा ८६ टक्के होता. त्यात यंदा ४६ टक्के घट असून मराठवाड्याला पाणी संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

Dam Storage
Borewell Water Level Measurement App : बोअरवेलची पाणी पातळी मोजणं झालं सोपं, अ‍ॅपच्या माध्यमातून घेता येणार नेमका अंदाज

मॉन्सूनचा हंगाम संपला तरी राज्यातील तब्बल ४४ धरणक्षेत्रात अजूनही दमदार पाऊस पडलेला नाही. उजनी, जायकवाडी, मुळा, मांजरा, माजलगाव, येलदरी, निम्न दुधना, तेरणा, खडकपूर्णा, पेनटाकळी, बेंबळा, गिरणा, वीर अशा महत्त्वाच्या धरणांतही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. काही धरणे अजूनही कोरडी आहेत. जलसंपदा विभागाकडील २ हजार ९९४ प्रकल्पांत १४२२.१२ टीएमसीपैकी १०७९.२५ टीएमसी (३०५६९.९४ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. परतीचा पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर पश्‍चिम घाटमाथ्यावर व पूर्व विदर्भात, मराठवाड्यात काही जिल्हयात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धरणांत आवक चांगलीच आवक झाली. जूनमध्ये अखेरच्या दहा दिवसांत नव्याने एकूण ३० टीएमसी पाण्याची आवक झाली होती. परंतु जुलै महिन्यात जवळपास १७ तारखेपर्यंत काहीशी उघडीप होती. त्यानंतर पावसाने राज्यातील विविध भागांत दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले, नद्यांनी आपली पातळी ओलांडल्याने धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाले होते. त्यामुळे कोकणातील आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही धरणे भरली.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने काही प्रमाणात उघडीप देण्यास सुरुवात केली. सप्टेंबरच्या अखेरीस काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील काही धरणे शंभर टक्के भरण्यास मदत झाली. तर जायकवाडी, उजनी अशा महत्त्वाच्या धरणांतील पाणीपातळी कशीबशी ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत गेला आहे. मराठवाड्यातील धरणांतील पाणीपातळी अजूनही कमीच आहे. विदर्भातील ऊर्ध्व वर्धा, पेंच तोतलाडोह, इटियाडोह, अरुणावती या धरणांत १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र काही धरणक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने ४४ धरणांत ८० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

Dam Storage
Water Crisis : राज्यातील ६५ धरणांत ८० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के पाणीसाठा

राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३९ मोठी धरणे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस झाल्याने पाण्याची बऱ्यापैकी आवक झाली आहे. मोठ्या धरणांतील पाणीसाठा ८५४.५८ टीएमसी म्हणजेच सरासरी ८३.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात ९६.४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत यंदा हा साठा जवळपास १३.२३ टक्क्यांनी कमी आहे.

यंदाचा धरणांतील विभागनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :

विभाग---संख्या---उपलब्ध पाणीसाठा---टक्के---गेल्या वर्षीची टक्केवारी

नागपूर---३८३---१४८.०१---९१.०२---८९

अमरावती---२६१---१३६.८४---८२.१५---९४

छत्रपती संभाजीनगर---९२०---१०३.६४---४०.४३---८६

नाशिक---५३५---१६१.२१---७६.९३---८६

पुणे---७२०---४३२.३४---८०.५६---९२

कोकण---१७३---१२४.५५---९५.२२---९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com