Satara News : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणांत गत वर्षीच्या तुलनेत कमी शिल्लक आहे. मॉन्सून वेळेत न आल्यास भीषण पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे.
गत वर्षी कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी या सहा धरणांत २६.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र मागील वर्षी कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. यंदा या प्रमुख धरणात १९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतील पाणीपातळी खूपच कमी आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसह सातारा तालुक्यासाठी उरमोडी धरण महत्त्वपूर्ण आहे. मात्र सर्वात भीषण परिस्थिती उरमोडी धरणातील पाणीसाठ्याची झाली आहे. या धरणात अवघा साडेचार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
तुलनेत या धरणात गत वर्षी ३९.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. बलकवडी धरण कोरडे पडले असून या धरणात निरंक पाणीसाठा झाला आहे. तारळी धरणातही पाणीसाठा कमी झाला असून या धरणात २४.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गत वर्षीच्या तुलनेत या धरणात निम्मा पाणीसाठा शिल्लक आहे. धोम धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्याच्या वीज निर्मितीच्या दुष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना व कण्हेर धरणांत पाणीसाठ्याची परिस्थिती बरी असून कोयनेत १३.२४ टक्के, तर कण्हरे १२.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील दोन वर्षांतील तुलनात्मक स्थिती
धरण २०२३ २०२४
कोयना १३.४७ १३.२५
धोम ३.२९ २.९०
बलकवडी ०.७२ ०.००
कण्हेर १.८५ १.२१
उरमोडी ३.८४ ०.४३
तारळी ३.१७ १.४५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.