
Nagpur -Ratnagiri National Highway Kolhapur : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मधील चोकाक ते उदगाव-अंकलीसह १० गावांतून जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने २५ जानेवारी २०२५ रोजी राजपत्र प्रसिद्ध केले. यामध्ये हरकती दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, हरकती देण्यापूर्वीच हातकणंगले तालुक्यातील चोकाक आणि माणगाववाडीच्या शेतकऱ्यांना जमीन मोजणीच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
१७ फेब्रुवारीला मोजणी होणार असल्याचे या नोटिसांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे १० गावांतील शेतकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. सरकारने दुटप्पीपणाची भूमिका बदलावी अन्यथा शेतकरी महामार्गाच्या विरोधात पेटून उठतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समिती अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या प्रक्रियेनंतर रेखांकन, डिमार्केशन आणि त्यांतर मोजणी अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून जमीन हडपण्याची सुरू असलेली धडपड पाहता शेतकऱ्यांना देशोधडीला लावायची त्यांना अतिघाई आहे. नियम डावलून शेतकऱ्यांना भीती दाखवून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला अंधारात ठेऊन त्यांना जमीन लाटण्याची जी घाई झाली आहे, ती त्यांनी थांबवावी अन्यथा तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. अशी माहिती पाटील यांनी दिली.
१० गावातून महामार्ग जाणार
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक ते उदगाव-अंकलीपर्यंतच्या १० गावातून हा मार्ग जाणार आहे. मागिल १ वर्षापासून चौपट भरपाई, उदगाव बायपास महामार्गावरुन हा मार्ग काढण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने वाद सुरू आहेत.
सध्या या मार्गाचे नव्याने भारत राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. या मार्गात चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, तमदलगे, निमशिरगाव, उमळवाड, उदगाव या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतर होणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरू आहे. परंतु सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर होत आहे.
निमशिरगांवचे शेतकरी सुदर्शन पाटील, राज्य सरकारने भूसंपादनाची नोटीस पाठवण्यापूर्वी सरकारने रेखांकन निश्चित करावे. याबाबत कुठल्याही शेतकऱ्यांना अजून किती क्षेत्र जाणार आहे याबाबत संभ्रमावस्था असताना, गडबडीने नोटीस पाठवण्यात आली आहे. सरकार जोरजबरदस्तीने कृत्ये करत आहे. आमचा विकासाला विरोध नाही परंतु रेडिरेकनरच्या ५ पट दर द्यावा अन्यथा आम्ही आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. असा इशारा पाटील यांनी दिला.
पोलीस बळाचा वापर केल्यास जशास तसे उत्तर
माजी खासदार राजू शेट्टी यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनीसाठी चौपट मोबदला द्यावा, असा इशारा दिला आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिला तरच भूसंपादन करावे. पोलीसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.