
Mumbai News : निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पहिल्या टप्प्यात पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आले असून अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही वगळण्यात येणार आहे. या महिलांकडून कोणतीही वसुली होणार नसल्याचेही राज्य सरकारने जाहीर केले आहे.
यामध्ये मोठ्या प्रमाणात नमो शेतकरी महासन्मान योजना आणि कृषी डीबीटीचा लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात अपात्र केलेल्यात संजय गांधी निराधार योजना आणि ६५ वर्षांवरील महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, अपात्र महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले असले, तरी कारवाईच्या भीतीने मोठ्या प्रमाणात महिला हा लाभ परत करीत आहेत. त्यांचे पैसे कोणत्या लेखाशीर्षांतर्गत ठेवायचे याचा प्रश्न महिला व बालविकास विभागासमोर होता. मात्र, आता त्यासाठी नवे ‘लेखाशीर्ष’ तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत एक लाख ६० हजार महिलांनी या योजनेतून माघार घेतली आहे. यातील काही महिलांनी आपला लाभ परत केला आहे.
राज्य सरकारने कोणतीही छाननी न करता आलेल्या महिलांचे अर्ज मंजूर केले होते. जी महिला अर्ज करेल तिला लाभ देण्याचे धोरण अवलंबल्याने २ कोटी ४७ लाख महिलांना आतापर्यंत लाभ देण्यात येत होता. आता गावोगावी मोहीम आखून महिलांची पडताळणी केली जात आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशांचा आधार घेत या निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
यासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २ लाख ३० हजार आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या १ लाख १० हजार महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १ लाख ६० हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही असेही तटकरे यांनी जाहीर केले आहे.
रक्कम वसूल करणार नाही
कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही, असे सांगत कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै, २०२४ ते डिसेंबर, २०२४ देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावर जाहीर केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.