
Dharashiv News : धाराशिव : जिल्ह्याच्या काही भागांत खासगी कंपन्यांकडून दीड वर्षापासून पवनचक्क्यांची उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी करार पद्धतीने घेतल्या जात आहेत. यात कंपन्यांकडून करारापेक्षा अधिक क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याला विरोध करणाऱ्यांना बाउन्सरकडून दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी एका गावात कंपन्यांचे कर्मचारी व बाउन्सरकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी काही संघटना आंदोलनाचा इशारा दिला असून धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी बुधवारी (ता. १८) विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून कंपन्यांची दादागिरी थांबविण्याची मागणी केली.
जिल्ह्यातील लोहारा, तुळजापूर, धाराशिव तालुक्यांत गेल्या दीड वर्षांपासून पवन चक्क्या उभारणीची कामे सुरू आहेत. बालाघाटच्या डोंगरावर हा परिसर असल्याने विविध ठिकाणी पवन चक्कींची उभारणी सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनीकडून करार पद्धतीने घेतल्या जात आहेत. मात्र करारापेक्षा नमूद केले आहे, त्यापेक्षा अधिक क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जात आहे. अधिक क्षेत्र बळकावण्यास विरोध केला तर कंपन्यांच्या बाउन्सरकडून शेतकऱ्यांना दमदाटी, धमकीही देण्याचे प्रकार वाढले आहेत, अशा तक्रारी काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई ही पिके आहेत. पवन चक्की उभी करण्याच्या जागेत जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याचा अभाव आहे. त्यामुळे पवन चक्कीचे साहित्य घेऊन जाण्यासाठीची वाहने उभ्या पिकांतून घातली जात असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पवन चक्की उभारणीचे साहित्य अवजड आहे. पंख्यांच्या पात्यांची लांबीही मोठी आहे. पात्याच्या लांबीमुळे अनेक ठिकाणी वाहन वळविताना अडचणी येतात. अशावेळी झाडांची तोडही केली जात आहे.
शिवाय पिकांतून वाहने घेऊन जाण्यास नकार दिला, तर तेथेही शेतकऱ्यांना दमदाटी करून जबरदस्तीने वाहने पिकातून नेली जात आहेत. त्यामुळे अशा भागातील शेतकरी हतबल झाले आहेत. काही ठिकाणी शेतकरी व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांत वादावादीचे प्रकार सुरू असून वाद विकोपाला गेले आहेत. दरम्यान, काही संघटनांही शेतकऱ्यांच्या बाजूने आणि कंपनीच्या विरोधात सक्रिय झाल्या आहेत. यापैकी काही संघटनांनी जिल्हाधिकारी, पोलिसांकडे निवेदने देऊन कंपन्यांविरुद्ध कारवाईची मागणीही केलेली आहे. त्यामुळे कंपन्या आणि शेतकरी, संघटनांतील वाद आगामी काळात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभेत मांडला प्रश्न
जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पवन चक्की मालकाकडून पोलिस, बाउन्सरमार्फत होणारी गुंडागर्दी थांबवावी, अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेत केली. तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मेसाई) गावामध्ये काही दिवसांपूर्वी बाउन्सरच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रकार घडला होता. आमदार यांनी बुधवारी विधानसभेत औचिताच्या मुद्द्यामध्ये हा विषय मांडत पवन चक्की मालकाची दहशत मोडून काढत संबंधित लोकांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली.
जवळगा (मेसाई) गावात काळ्या रंगाच्या दहा ते बारा गाड्या आल्या. त्यातून मोठ्या संख्येन बाउन्सर उतरले व त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस बघ्याची भूमिका घेत राहिले. अशावेळी पोलिस तक्रारीची वाट पाहतात. अनेक प्रकरणात पोलिस स्वतःहून कारवाई करतात. पोलिस व गुंडागर्दी करणाऱ्या बाउन्सरवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.