
Nashik News : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये नैसर्गिक रानभाज्यांचा वापर करणे महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय दोन दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या (रामेती) प्रांगणात करण्यात आले आहे. त्या वेळी भुसे बोलत होते.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, रामेती संस्थेचे प्राचार्य शिवाजी आमले, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, कैलास शिरसाठ आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, की कोरोना काळात प्रत्येकाला निरोगी जीवनाचे महत्त्व समजले. रानभाज्यांच्या वापरास प्रोत्साहन देऊन त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कृषी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ‘आत्मा’च्या आवारात यासाठी कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
प्रास्तविक ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले. भुसे व झिरवाळ यांच्या हस्ते काही बचत गटांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप बच्छाव यांनी केले.
रानभाज्या म्हणजे माणसांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली देणगी आहे. दुर्गम भागातील शेतकरी बांधवांना रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांना तंत्रशुद्ध पद्धतीने सांगण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
हा रानभाजी महोत्सव केवळ एक-दोन दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित न करता त्यामध्ये सातत्य ठेवण्याची अपेक्षा या वेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.