

Alibaug News : टाटा पॉवर, रिलायन्स एनर्जी या कंपन्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूरमध्ये आता सिनारमस पल्प ॲण्ड पेपर कंपनीने नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला आहे. सिनारमस कंपनीसाठी येथील ४८७ हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे. यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून देशाबाहेरील कंपन्यांना भूसंपादनासह ७३६ हेक्टर जागा मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने १६ वर्षांपूर्वी प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये खंडित झालेला संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहेत.
रायगड जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवणारे हे प्रकल्प असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारचा आहे. तर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे.
स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु भूसंपादन करताना पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावू नका, अशी आग्रही भूमिका आहे. भूसंपादनापोटी मिळणारा मोबदला, पुनर्वसन, जैवविविधतेचे संवर्धन कसे होणार, याबाबत चर्चा करून जो पर्यंत प्रशासनाकडून ठोस माहिती देण्यात येत नाही, तो पर्यंत इंचभर जमीनही देणार नाही, अशी शेतकऱ्यांची १९ वर्षांपूर्वीची भूमिका आजही कायम आहे. यासाठी गावागावांमध्ये ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
यापूर्वी बहुतांश आंदोलने श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून झाली होती. आता नऊ गाव विस्तारित शेतकरी सामाजिक संस्थेने आंदोलनात उडी घेतली आहे. या संस्थेची स्थापना अलीकडेच झाली आहे. आधी गावातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर सुपीक जमिनी होत्या, मात्र सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे बहुतांश जमिनी नापिक झाल्या आहेत. पंधरा वर्षे झाली तरी ना कारखाने उभे राहिले ना भूमिपुत्रांना रोजगार मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.
नव्याने येणारे प्रकल्प
कोळसा किंवा रासायनिक प्रकल्पांना होणारा विरोध पाहून येथे कागद निर्मितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी चीनच्या नाईन ड्रॅगन्स कंपनीनेही परिसरात चाचपणी केली होती. आता इंडोनेशियातील सिनारमस कंपनीने प्रकल्प उभारणीस रस दाखवला आहे.
सिनारमस पल्प अँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबरच युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीनेही प्रस्ताव सादर केला आहे. याचबरोबर एप्रिल एशिया या कागद निर्मिती करणाऱ्या कंपनीने पाहणी केल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली.
एक हजार हेक्टर जागेची गरज
टाटा पॉवर कंपनीसाठी संपादित केलेली ३८७ हेक्टर जागा सिनारमस कंपनीसाठी देण्याचे राज्य सरकाने कबूल केले आहे. प्रकल्पासाठी १०० एकर जादा जमिनीची गरज आहे. या व्यतिरिक्त धाकटे शहापूर- मोठे शहापूर या गावांमधील ७३६ हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे.
ही सर्व जागा खारभूमीच्या क्षेत्रातील असल्याने किमान दहा फूट भराव करावा लागेल. त्यामुळे शहापूर, धाकटे शहापूर गावांबरोबरच कमळपाडा, चरी, कोपर, खिडकी, लेभी, सुतारपाडा गावांत उधाणाचे पाणी शिरण्याचा धाेका आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.