

Jalgaon News : सातपुड्यालगतच्या भागासाठी वरदान ठरणाऱ्या तापी नदीवरील ‘मेगा रिचार्ज’, अर्थात महाकाय जलपुनर्भरण योजनेबाबत शासनाने मध्य प्रदेश सरकारसोबत करार केला आहे. तसेच मध्यंतरी त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. दोन दशकांपासून केवळ चर्चा होत असलेल्या या योजनेबाबत पुढे चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
हवाई पाहणी, सर्व्हेक्षण, डीपीआरनंतर मध्यंतरी हा प्रकल्प रखडला होता. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, असे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले मोठे चार तालुके आहेत. या तालुक्यांमधील बहुतांश भाग केळी व बागायती शेतीचा.
त्याला प्रचंड पाणी लागते, म्हणून भूगर्भातून पाण्याच्या उपशावर इथली शेती, केळीबागा अवलंबून आहेत. विशेषत: चोपडा, यावल व रावेर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला आहे. त्यामुळे हे तिन्ही तालुके ‘डार्क झोन’मध्ये कधीच गेले. या गरजेतून तापी नदीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करण्याच्या दृष्टीने या योजनेचा विचार पुढे आला. १९९९ पासून या प्रकल्पाच्या उभारणीची चर्चा सुरू आहे. २००४ पासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन आमदार (कै.) हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून हालचाली सुरू झाल्या.
तीन लाख हेक्टरला लाभ
या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला २० टीएमसी, तर मध्य प्रदेशला २५.५० टीएमसी, असे ४५.५० टीएमसी पाणी तापी नदीतून वापरता येणार आहे. पावसाळ्यात खारीया घोटी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील तालुक्यात ठिकठिकाणी नदी-नाल्यात पाणी सोडले जाईल.
या योजनेमुळे प्रत्यक्ष सिंचन एक लाख दोन हजार हेक्टरमध्ये होणार असून, महाराष्ट्रात २४ हजार हेक्टर, तर मध्य प्रदेशात ७८ हजार हेक्टरमध्ये होईल. पुनर्भरणाद्वारे अप्रत्यक्ष लाभ महाराष्ट्राला दोन लाख ११ हजार हेक्टर, तर मध्य प्रदेशला ९६ हजार हेक्टर, असा एकूण तीन लाखांचा १० हजार हेक्टरमध्ये अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.
११ हजार कोटींचा प्रकल्प
मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये उमा भारती जलस्त्रोत मंत्री असताना गती आली होती. राज्यात गिरीश महाजन जलसंपदामंत्री होते. दोघांनी या योजनेची हवाई पाहणी केली. नंतर नियोजन भवनात आढावाही घेतला. नंतर या योजनेचे काम रखडले. मूळ योजनेचे काम सहा हजार १६८ कोटी रुपयांचे होते. पण या योजनेची किंमत आता वाढली आहे.
...अशी आहे योजना
तापी नदीचे गुजरातला वाहून जाणारे पाणी मेळघाटातील खारीया घोटीजवळ अडवून नंतर उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या माध्यमातून त्याचे जमिनीत पुनर्भरण केले जाणार आहे. यासाठी सातपुड्याच्या रांगेतून मध्य प्रदेशातील आशिरगडपासून तापी नदीचे पाणी कालव्यांद्वारे वळवून रावेर, यावल, चोपडा तालुक्यांतील नदी- नाल्यात उतरून मेगा रिचार्ज होऊ शकणार आहे. यासाठी मध्य प्रदेशातील खारीया घोटी येथे तापी नदीवर धरण बांधून त्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी पावसाळ्यात बऱ्हाणपूर, यावल, चोपडा व रावेर तालुक्यांत कालव्याच्या माध्यमातून सर्व नदी-नाल्यांमध्ये पुनर्भरण विहिरी करून पाणी जिरविण्यात येणार आहे.
भूगर्भजल पातळी वाढणार
बऱ्हाणपूर, रावेर, यावल, चोपडा या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यांमधील जमिनीच्या पायथ्याशी निसर्गाने बझाड (भूगर्भातील पोकळी) दिली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पाणी जिरणे व सातपुड्याच्या पायथ्यापासून तापी नदीपर्यंतच्या सर्व भागातील भूगर्भात पाणीपातळीत वाढ होण्यासाठी योजना महत्त्वाची आहे. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश केळी पिकविणारा असल्याने भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे भूजल पातळी ५०० ते ७०० फूट खाली गेली आहे. मेगा रिचार्ज योजनेमुळे भूजल पातळी १०० फुटांपर्यंत येण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.