
कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या (Agriculture Minister) राजकीय स्वार्थासाठी बेकायदेशीररित्या पैसे जमा करून सिल्लोड महोत्सव (Sillod Festival) आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सिल्लोड महोत्सव रद्द करण्यात यावा, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
राज्याचे कृषिमंत्री सत्तारांच्या सिल्लोड मतदार संघात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी पंधरा कोटीपेक्षा अधिक रक्कम वसुलीचे आदेश कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यासाठी प्रवेशिका छापण्यात आल्या. या प्रवेशिकांवर कृषिमंत्र्याचे आणि जिल्हाधिकाऱ्याचे फोटो देण्यात आले आहेत. मात्र प्रवेशिकावर मूल्य, क्रमांक आणि आयोजकांचे नाव नाही. त्यामुळे सिल्लोड महोत्सव रद्द करण्याची मागणी घनवट यांनी केली आहे.
शेतीनिविष्ठांचे उत्पादक, वितरक, कृषी सेवा केंद्र चालकांकडून सक्तीने निधी जमविण्यात येणार आहे. सिल्लोड महोत्सवासाठी २५ हजार, १५ हजार, १० हजार व ७ हजार ५०० रुपयांच्या प्रवेशिका छापण्यात आल्या.
जिल्ह्याच्या आकारानुसार वसुलीची सक्ती केली जात आहे. उद्योजकांना ही महागडे स्टॉल घेण्याची सक्ती होत आहे. वसुलीसाठी, कृषी अधिकाऱ्यांना शिवीगाळ, निलंबित करण्याच्या, बदली करण्याच्या धमक्या देत असल्याचे ही प्रकार घडत आहेत. त्यामुळे हा व्यावसायिकांवर दरोडा असल्याची खंत अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे.
या महोत्सवासाठी ज्या पद्धतीने वसूली करण्यात येत आहे, त्यातून कृषि विभागात भ्रष्टाचार माजेल. आणि शेवटी त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल. या महोत्सवातून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिवाय कुणाचचाही फायदा नाही. त्यामुळे या बेकायदेशीर वसूलीवर आळा घालून महोत्सव रद्द करण्यात यावा. तसेच या वसूली प्रकरणाची ईडी किंवा आयकर विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी घनवट यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.