Irrigation Project : पाडळसेसह अनेक सिंचन प्रकल्पाचे भिजत घोंगडे

Khandesh Irrigation Project : खानदेशात अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यात नंदुरबारातील पूर्व भागातील तापी - बुराई प्रकल्प, जळगावातील पाडळसे, गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाचे फक्त स्वप्नच शेतकऱ्यांना दाखविण्यात आले आहे.
Irrigation
IrrigationAgrowon

Jalgaon News : खानदेशात अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यात नंदुरबारातील पूर्व भागातील तापी - बुराई प्रकल्प, जळगावातील पाडळसे, गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाचे फक्त स्वप्नच शेतकऱ्यांना दाखविण्यात आले आहे. पुरेसे पाणी नसल्याने टंचाई वाढत आहे. शिवाय शिवारही उजाड असून, शेतकरी वर्गाला अनेक वर्षांपासून प्रकल्प केव्हा पूर्ण होतील, याची प्रतीक्षा आहे.

याशिवाय जळगाव जिल्ह्यातील पाडळसे (ता. अमळनेर) येथील पाडळसे निम्न तापी सिंचन प्रकल्प सुमारे २७ वर्षे रखडला आहे. हा प्रकल्प तापी नदीवर असून, त्याचेही काम अपूर्ण आहे. त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सुमारे तीन हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.

Irrigation
Irrigation Project Fund : सोलापुरातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना मिळणार निधी

परंतु काम प्रत्यक्षात गतीने सुरू नाही. अनेकदा मान्यता मिळाली, पण प्रकल्पाचे काम मार्गी लागले नाही. या प्रकल्पामुळे धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावातील अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल व जळगाव या भागास लाभ होणार आहे. सुमारे १२ ते १४ हजार हेक्टरला लाभ होईल. कायम टंचाईग्रस्त असलेल्या धरणगाव, अमळनेर व शिंदखेड्यास चांगला लाभ यामुळे होईल. परंतु प्रकल्प अनेक वर्षे रखडला आहे.

गिरणा नदीवरील सात बलून बंधारेदेखील चर्चेतच आहेत. सुमारे २२ ते २५ वर्षे या प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. त्यास अंतिम मंजुरी मिळाली आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव या भागांत हे बंधारे प्रस्तावित आहेत. सुमारे १२०० कोटी रुपये निधी त्यांना हवा आहे. केंद्र सरकारने बलून प्रकल्पास प्रायोगिक प्रकल्पात समाविष्ट करून घेतले असून, केंद्राकडून मोठ्या निधीची अपेक्षा आहे.

सुमारे चार हजार हेक्टरला या प्रकल्पामुळे लाभ होईल. तसेच गिरणा काठची टंचाई कायमची दूर होईल. वाळूउपसा कायमचा बंद होऊ शकतो. लिंबू, केळी, मोसंबी व अन्य पिकांची पारंपरिक शेती फुलून शिवार हिरवे होईल. अवर्षणप्रवण गिरणा पट्टा समृद्ध होईल, परंतु या प्रकल्पासाठी कुणी पाठपुरावा करीत नाही. ज्यांनी पाठपुरावा केला, त्यांची दखल शासनाने घेतली नाही.

Irrigation
Irrigation Projects : दर पंचवार्षिकला तापतो अपूर्ण प्रकल्पांचा मुद्दा

‘तापी बुराई’ प्रकल्प अपूर्ण...

नंदुरबार जिल्ह्यातील तापी - बुराई प्रकल्पदेखील अपूर्ण आहे. तापी - बुराई उपसा सिंचन योजना मार्गी लावा, अशी मागणी पर्व भागातील शेतकरी अनेक वर्षे करीत आहेत. नंदुरबारातील मोठा भाग अवर्षणप्रवण आहे. त्यात नंदुरबारचा पूर्व भाग व धुळ्याचा पश्‍चिम भाग समाविष्ट आहे. या भागासाठी तापी - बुराई योजना वरदान ठरू शकते.

या योजनेत आसाणे, घोटाणे, न्याहली आदी गावांचा समावेश आहे. परंतु योजना पूर्णच झालेली नाही. योजना हाती घेतली, पण अपूर्ण आहे. शासनाने अलीकडे आणखी निधी मंजूर केला आहे. जलवाहिनीने या भागात पाणी आणण्याची ही योजना आहे. परंतु काम रखडत सुरू आहे. तापी नदीवरून पाणी उचलून ते बुराई प्रकल्पात टाकावे. तापी नदी ते बुराई प्रकल्प या दरम्यान जलवाहिनी टाकून यातून विविध गावे व शिवारासही पाणी देण्याची ही योजना आहे. परंतु ती वर्षानुवर्षे रखडल्याने तिची किंमतही वाढत असून, निधीही अधिक लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com