Mango Orchard Management: आंबा फळधारणेमध्ये बऱ्याच समस्या असतात. आंब्याचे काही वाण हे एक वर्षाआड फळधारणा होणारे असतात. उदा. दशहरी, लंगडा, चौसा इ. तर काही वाण दरवर्षी फळधारणा होणारे असतात. उदा. नीलम तोतापुरी इ. याच गटामध्ये रत्ना, आम्रपाली, मल्लिका आणि गुजरात कृषी विद्यापीठाने नुकताच शिफारस केलेला सोनपरी यासारख्या विविध संकरित वाणांचा समावेश होतो. केसर हा वाण मात्र सर्वसाधारणतः दरवर्षीच येणारा म्हणून परिचित आहे. .आंबा लवकर येण्याचे फायदेबागेत फळधारणा लवकर होऊन एप्रिलच्या सुरुवातीस केसर आंबा काढणील आला तर चांगला दर मिळतो. सुरुवातीला असलेल्या दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत असणारा दर पुढे कमी होत होत १२, १३ मेपर्यंत अगदी ६० ते ७० रुपये खाली येतो.त्या पुढे २०, २५ मेनंतर अगदी ३० ते ३५ रुपये किलोनेही विकला जातो. त्यामुळे बाजारामध्ये आपला आंबा लवकरात लवकर कसा येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. सहा वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या बागेमध्ये उत्पादनही सात ते दहा टन मिळाले तरच एकरी सात ते दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देऊ शकते..Mango Orchard Farming: अतिघन आंबा बागेतील फूल-फळ गळतीची कारणे.छाटणीआंब्याला येणारा मोहर हा थंडीच्या प्रमाणावर अवलंबून असतो. थंडीप्रमाणे डिसेंबर - जानेवारीमध्ये तर काही भागात अगदी फेब्रुवारीमध्येही मोहर येतो. पुढील हंगामातील मोहर लवकर येण्यासाठी या वर्षीची आंबा काढणी होताच म्हणजेच २० मेच्या दरम्यान बागेतील छाटणी होणे आवश्यक असते. त्यानंतर खते, पाणी देण्याची प्रक्रिया वेळेत पार पाडल्यास जूनच्या मध्यावर बागेत पूर्ण पालवी येऊ शकते. मात्र गेल्या वर्षीच्या वातावरणातील बदलामुळे या वर्षी आंबा काढणी उशिरापर्यंत चालू राहिली. त्यामुळे छाटणीही उशिरापर्यंत चालू राहिली. ज्या बागायतदारांना छाटणी वेळेत करणे शक्य झाले, त्यांच्या बागांमध्ये १५ ते २० जूनच्या दरम्यान आलेली पालवी आता पक्व होऊन गडद हिरवी होऊ लागली आहे.आंबा काडी पक्व होण्यास लागणारा कालावधी हा वाणाप्रमाणे वेगवेगळा असतो. उदा. केसर वाणामध्ये सर्वसाधारण तीन महिने, हापूस वाणामध्ये सात ते आठ महिने तर नीलम, तोतापुरी या दरवर्षी येणाऱ्या वाणामध्ये नवीन पालवीवर सुद्धा मोहर येऊ शकतो..पालवीची काळजी घेणेपावसाळ्यात पालवी येत असल्याने त्यावर रसशोषक किडी, पान खाणारी अळी, शेंडअळी आदी किडी आणि करपासारखे रोग यांचा प्रादुर्भाव होतो. पालवीच्या संरक्षणासाठी वेळीच फवारण्या घेणे गरजेचे असते.नवीन पालवी लवकरात लवकर पक्व करून घेणे अत्यंत आवश्यक असते. या पक्वतेच्या प्रक्रियेवर पावसाचा व उन्हाचा कालावधी परिणाम करतो. पुढे ऑगस्ट अखेर ते सप्टेंबरच्या सुरुवातीस नवीन पालवीही येते. .ही पालवीही सांभाळून पक्व करून घेणे गरजेचे असते. त्यासाठी ०ः५२ः३४, ००ः००ः५० या सारख्या पालाशयुक्त खतांची ६ ते ७ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात दोन फवारण्या देता येतील. त्यामुळे १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत मोहर येतो.हा मोहर येण्याच्या साधारणतः वीस दिवसआधी बागेत पुन्हा पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) चार टक्के प्रमाणात (४० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे एक फवारणी घेतल्यास मोहर भरपूर व जोमदार येण्यास मदत होते..Mango Cultivation Techniques: अतिघन केसर आंबा लागवड तंत्र.हमखास व लवकर मोहर येण्यासाठी वाढ नियंत्रकांचा वापरलवकर व हमखास मोहर येण्यासाठी वाढ नियंत्रकाचा वापर फायद्याचा ठरतो. बागेमध्ये क्लोरमेक्वाट क्लोराइड (५० टक्के एसएल) याचा वापर शक्य असला तरी जमिनीतून पॅक्लोब्युट्राझोल वापर अधिक फायद्याचे ठरते. या वाढरोधकामुळे झाडामध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या जिबरेलिक आम्लांच्या निर्मितीस काही काळ अडथळा तयार होतो.काडी पक्वतेवेळी कार्बन आणि नत्राचे गुणोत्तर योग्य राहण्यास मदत होते. यांच्या योग्य प्रमाणासाठी पावसाळ्यानंतर बागेस अगदी ७० ते ८० टक्के मोहर दिसेपर्यंत पाणी देणे बंद करावे. नंतर नत्रयुक्त खतांची मात्रा देऊ नये. या गोष्टी पॅक्लोब्युट्राझोल प्रक्रियेसोबत केल्यास काडीची पक्वता लवकर येते. त्याचबरोबर सप्टेंबरची पालवीही काही प्रमाणात आखूड येत असल्याचे सिद्ध झाले आहे..अन्य झाडांच्या तुलनेमध्ये वाढरोधक दिलेल्या झाडांना ८२ ते ८५ टक्के अधिक मोहर येऊन आंब्याच्या उत्पादनात २.६० ते २.८० पटीने वाढ होत असल्याचे प्रयोगात आढळले आहे. वाढरोधकाच्या वापरामुळे आंब्याला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात येणारी नवीन फूट पाच टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहते. इतकेच नाही तर नवीन फुटव्याची लांबीही बरीच कमी राहते. अशा झाडाला १० ते १५ नोव्हेंबरपासून मोहर येण्यास सुरुवात होऊन नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण मोहर येत असल्याचे आढळले आहे..वाढ नियंत्रक वापरण्याची योग्य पद्धतयोग्य मशागती खाली असलेल्या फळातील झाडांनाच फक्त शिफारस केल्याप्रमाणे वाढ नियंत्रक योग्य मात्रेत, योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी देणे गरजेचे असते.योग्य मात्रा : बाजारात विविध कंपन्यांचे पॅक्लोब्युट्राझोल वेगवेगळ्या टक्केवारीमध्ये (२३ ते ४० टक्के) उपलब्ध आहे. टक्केवारीनुसार योग्य मात्रा घेणे गरजेचे असते. पुढील सर्व मात्रा ही पॅक्लोब्युट्राझोल (२३ टक्के) गृहीत धरून दिलेली आहे..योग्य मात्रा ठरवण्यापूर्वी आंबा झाडाचा घेर (व्यास) मोजणे गरजेचे असते. उदा. झाडाची कॅनॉपी खोडापासून उजवीकडे दीड मीटर आणि डावीकडे दोन मीटर आहे. या दोन्हीची बेरीज साडेतीन मीटर होते. या व्यासाच्या प्रति रनिंग मीटर तीन मि.लि. वाढरोधक द्यायचे आहे. म्हणजे व्यास साडेतीन मीटर गुणिले तीन म्हणजे एकूण साडेदहा मि.लि. वाढरोधक मात्रा त्या झाडाला द्यावी.वाढरोधक देण्याची योग्य पद्धत : प्रती झाड ठरलेली वाढरोधक मात्रा (आपल्या उदाहरणामध्ये १०.५ मि.लि.) साधारण तीन लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावे. खोडापासून साधारणतः अर्धा ते एक फूट अंतरावर दहा-बारा सेंमी आकाराचे व तितकेच खोल आळे तयार करावे. त्यात वरील द्रावण ओतून मातीने झाकून टाकावे. सर्वसाधारणपणे पॅक्लोब्युट्राझोल प्रति लिटर अडीच ते तीन मि.लि. मिसळावे. हे द्रावण प्रत्येक झाडाच्या कॅनॉपीप्रमाणे मोजून द्यावे..वाढरोधक देण्याची योग्य वेळझाडाला मोहर येण्याच्या सर्वसाधारण तीन महिने आधी हा काळ वाढरोधक देण्याची योग्य वेळ असते. म्हणजे कोकण व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात २० जुलैच्या दरम्यान वाढरोधक द्यावे. मात्र या काळापर्यंत चांगला पाऊस झालेला असावा. विहिरीला किंवा तुमच्या पाण्याच्या स्रोतामध्ये उन्हाळ्यात पुरेल इतके पाणी उपलब्ध झाले असल्याची खात्री करावी. ज्या ठिकाणी अद्याप पाऊस किंवा पाणी उपलब्ध झालेले नाही, त्यांना वाढरोधक देण्याची घाई करू नये. अगदी ऑगस्टच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत वाट पाहू शकतो. या काळापर्यंतही उन्हाळ्यात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यास वाढरोधक देणे संपूर्णपणे टाळावे..वाढरोधक देतेवेळी जमीन वाफसा स्थितीमध्ये असावी. वाढरोधक दिल्यानंतरही किमान तीन-चार दिवस जमीन वाफसा स्थितीत असावी. वाफसा नसल्यास किंवा पावसाच्या स्थितीमध्ये वाढरोधक वाया जाऊ शकते. खर्च करूनही उपयोग होणार नाही.एखाद्या झाडास गरजेपेक्षा कमी मात्रा दिल्यास त्या झाडास अपेक्षित मोहर येत नाही.एखाद्या झाडास शिफारशीपेक्षा जास्त मात्रा दिल्यास मोहर फार जास्त, आखूड आणि काही ठिकाणी तर गुच्छामध्येही येऊ शकतो. एखाद्या ठिकाणी अगदी खोडावरही मोहर आल्याचे दिसून येते. जास्त मात्रा झाल्यास झाडांना उन्हाळ्यात धक्का (शॉक) बसू शकतो. चुकीने असे झाल्यास अशा झाडांना पुढील वर्षी वाढरोधक देऊ नये किंवा शिफारशीच्या अर्धीच मात्रा द्यावी..वाढरोधक दिलेल्या बागेची पुढील काळजी कशी घ्यावी?वाढरोधक दिलेल्या बागेमध्ये मोहर लवकर व जास्त प्रमाणात येतो. त्यामुळे बागेला नियमित (अगदी एप्रिल, मे मध्ये फळ काढल्यानंतरसुद्धा) सिंचन सुरू ठेवावे.आलेल्या मोहराच्या जोपासनेसाठी शिफारशीपेक्षा सव्वा ते दीडपट जास्त खतमात्रा द्याव्यात.आलेल्या मोहराच्या जोपासनेसाठी विद्राव्य खतांच्या गरजेप्रमाणे फवारण्या, मोहर आल्यानंतर जीएची ५० पीपीएम प्रमाणे फवारणी, कीड व रोग नियंत्रणासाठी दापोली विद्यापीठाने दिलेले फवारणीचे वेळापत्रक पाळणे या बाबींवर भर द्यावा..फळे काढण्याआधी सहा ते आठ महिने वाढरोधक जमिनीतून दिलेले असते. त्याचे फळामध्ये अंश जागतिक संघटनेने ठरवून दिलेल्या (०.०५ मिलिग्रॅम प्रति किलो) पातळीपेक्षा कितीतरी कमी (०.०१ ते ०.०३ मिलिग्रॅम प्रति किलो) राहू शकतात. त्यामुळे ग्राहकांसाठी व निर्यातीसाठीही कोणतीही अडचण येण्याची शक्यता राहत नाही, हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे मनातून शंका काढून दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी सर्व उपाययोजना नक्की कराव्यात.- डॉ. भगवानराव कापसे ९४२२२९३४१९लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.