Compensation Demand: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांनी सोमवारी (ता.२३) मुंबई-गोवा महामार्ग तब्बल तीन तास रोखून धरला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत बागायतदारांसाठी भरपाई जाहीर करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला..कोकणातील आंबा व काजू पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे या उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आंबा, काजू बागायतदार नांदगाव येथे जमू लागले. साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांच्यासह हजारो आंबा, काजू उत्पादकांनी मुंबई-गोव महामार्ग रोखला. .Farmer Protest: आंबा, काजूची भरपाईची घोषणा न झाल्यास आंदोलन.जय जवान जय किसान, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्चा खाली करा, अशा घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला. आंदोलकांच्या हातात शहीद भगतसिंग यांचा फोटोही दिसत होता. आंदोलनाच्या अनुषंगाने कडेकोट पोलिस बंदोबस्त परिसरात ठेवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबईकडून येणारी वाहतूक तळेरे वैभववाडी फोंडामार्गे वळविली, तर गोव्याकडून येणारी वाहतूक हुमरट, फोंडा, वैभववाडी तळेरे मार्गे वळविली. .Farmer Protest: अन्नदात्याच्या सन्मानासाठी चिखलीत ‘अन्नत्याग’ आंदोलन.ही गोष्ट श्री. शेट्टी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलनाचे ठिकाण बदलत असून महामार्गानेच दक्षिणेकडे चालत जायचे आहे, असे शेतकऱ्यांना सांगितले. त्यानुसार सर्व शेतकरी नांदगाववरून कणकवलीच्या दिशेने चालत निघाले. दरम्यान, रखरखत्या उन्हातदेखील शेतकरी जोरदार घोषणाबाजी करीत होते. अडीच तीन किलोमीटर चालल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे चर्चेकरिता आल्या. .त्यांनी श्री.शेट्टी यांच्याशी चर्चा केली. अधिवेशन सुरू आहे. पुढील दोन दिवसांत भरपाई संदर्भात ठोस निर्णय होईल, असे आश्वासन धोडमिसे यांनी दिले. यावर जर दोन-तीन दिवसांत आश्वासनांची पुर्तता झाली नाही तर वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला. शेतकऱ्यांनी अनुमती दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.