Sesame Management : उन्हाळी तीळ पिकाचे व्यवस्थापन

Sesame Farming : तीळ हे भारतातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. देशात महाराष्ट्र, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये तिळाची लागवड केली जाते. यातील उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागामध्ये सर्वाधिक तीळ उत्पादन होते.
Agriculture Management
Agriculture ManagementAgrowon

डॉ. एम. व्ही. धूप्पे, डॉ. एस. पी. पोले, डॉ. पी. पी. अंबिलवादे

Sesame Management : तिळाचे आरोग्यासाठी फायदे :

तीळ बियांमध्ये उच्च दर्जाचे प्रथिने आणि अत्यावश्यक अमिनो ॲसिड असतात. विशेषत: मेथिओनाइनसारखी अमिनो आम्ले वृद्धत्व रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. तिळामध्ये आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक अशी लिनोलिक ॲसिड, जीवनसत्त्वे E, A, B, B-२ आणि नियासिन, खनिजे आणि कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतात.

तिळाच्या तेलामध्ये ८५ टक्के मेदाम्ले (फॅटी ॲसिड) असून, ते कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि कोरोनरी हृदयरोग टाळण्यास मदत करतात. तिळाच्या तेलाने मालिश केल्यास मुरूम, त्वचा रोगात फायदा होतो. दातांच्या आजारात तीळ फायदेशीर आहे.

१० ग्रॅम काळे तीळ रोज सकाळी चावून खाल्ल्यानंतर हिरड्या निरोगी आणि दात मजबूत राहतात. तीळ दृष्टी वाढवते, कफ, संधिवात, सूज, वेदना कमी करते. तेलात कडुलिंबाची पाने मिसळल्याने त्वचेचे आजार दूर होतात.

तिळाचे उत्पादन वर्षातून तीन वेळा घेता येते. खरीप हंगामाव्यतिरिक्त उन्हाळी आणि अर्ध-हिवाळी हंगामातही तिळाची लागवड केली जाते. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत तीळ पिकासाठी उन्हाळी हंगाम अतिशय अनुकूल काळ मानला जातो. महाराष्ट्र राज्यापुरता विचार केल्यास पूर्व विदर्भात उन्हाळी भाताला पर्याय म्हणून उन्हाळी तीळ घेणे फायदेशीर ठरत आहे.

Agriculture Management
Sesame Market : तिळाचे दर १६ हजार रुपयांवर

त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी तीळ लागवडीकडे कल वाढत आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही शेतकरी उन्हाळी भुईमुगाऐवजी कमी कालावधी अन् कमी खर्चात येणाऱ्या तीळ पिकाला प्राधान्य देत आहेत. तिळाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पुढील प्रकारे व्यवस्थापन करावे.

हवामान : तिळाची चांगली उगवण १५ अंश सेल्सिअस या किमान तापमानात होते. पिकांच्या कायिक वाढीसाठी २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. तीळ पिकाच्या फूल आणि फळधारणेसाठी २६ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान उत्तम मानले जाते. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते.

जमीन : वाळूमिश्रित पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पिकाची चांगली वाढ होते. त्याचप्रमाणे सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ इतका असावा. निचरा न होणाऱ्या पाणथळ जमिनीत तिळाचे पीक चांगले वाढत नाही.

पूर्वमशागत : तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन तयार करताना भुसभुशीत पण टाळूवर थोडीशी टणक राहील अशा पद्धतीने पूर्वमशागत करावी. तीळ पिकासाठी जमिनीची मशागत करताना नांगरट करणे टाळावे. नांगरणीऐवजी उन्हाळ्यात उभी-आडवी वखरणी करून शेवटच्या वखरणीच्या वेळी एकरी साधारणतः सहा ते आठ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकावे. ते जमिनीत मिसळून जमीन चांगली भुसभुशीत करावी. काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे. पठाल फिरवून पेरणी करावी.

पेरणीची वेळ : उन्हाळी तिळासाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते.

पेरणीची पद्धत : पेरणीच्या पद्धतीचा थेट परिणाम तिळाच्या उत्पादनावर होतो. पेरणीसाठी उत्तम प्रतीचे ४ ते ५ किलो प्रति हेक्‍टरी बियाणे पुरेसे होते. पेरणी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर पाभरीने करावी. पाभरीने पेरणी करत असताना बारीक वाळू किंवा चाळून घेतलेले गांडूळ खत किंवा शेणखतात मिसळून बियाणे पेरावे. बियाण्याचे वितरण प्रमाणशीर होऊन एकसारख्या प्रमाणात पडते.

Agriculture Management
Sesame Sowing : खानदेशात तिळाचे क्षेत्र अल्पच

पेरणी ४५ सें.मी. अंतरावर असल्यास ओळीतील दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून विरळणी करावी. पेरणी ३० सें.मी. अंतरावर केली असल्यास विरळणी १५ सें.मी. अंतर ठेवून करावी. विरळणी पेरणीनंतर २१ दिवसांनी करावी. २.५ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो म्हणून योग्य ती काळजी घ्यावी.

बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बियाण्यांस तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यामुळे जमिनीतून उद्‍भविणाऱ्या रोगांना आळा बसतो. बियाण्याची उगवण चांगली होते.

खत व्यवस्थापन : ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्‍टरी जमिनीत शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले मिसळून घ्यावे. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी नत्राचा अर्धा हप्ता २५ किलो नत्र देऊन पाणी द्यावे. अधिक उत्पादनासाठी पीक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत युरिया (२ टक्के) २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

आंतरमशागत : उन्हाळी तिळाच्या पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरून घ्यावेत. उन्हाळी तीळ पेरणीनंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांनी पहिली व त्यानंतर आठ दिवसांनंतर दुसरी विरळणी करावी. दोन तीळ रोपांतील अंतर दहा ते पंधरा सेंटिमीटर आणि रोपांची एकरी संख्या जवळपास एक लाखापर्यंत राहील याची काळजी घ्यावी. उन्हाळी तीळ पिकात आवश्‍यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या किंवा खुरपण्या द्याव्यात. निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे. सुरुवातीच्या एक महिन्याच्या काळात उन्हाळी तिळाचे पीक तणविरहित राहील याची काळजी घ्यावी.

पाणी व्यवस्थापन : मुख्यतः फुले येण्याच्या कालावधीत नवे बोंड्या भरण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. गरजेप्रमाणे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तीळ पिकास जमिनीच्या मगदुरानुसार सरासरी ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात.

योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळी हंगामात ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

संपर्क : डॉ. मोहन धुप्पे, ९६२५३५२४३७
(गळीतधान्ये विशेषज्ञ, गळीत धान्ये संशोधन केंद्र, लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com