
Maize Cultivation Update : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरदार सरी बरसत आहेत. इगतपुरी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी इगतपुरी व घोटी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जूनच्या सर्वाधिक अकरा दिवस येथे पावसाने हजेरी लावलेली आहे.
याशिवाय सुरगाणा तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. तर त्रंबकेश्वर व पेठ तालुक्यांतही पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे मात्र गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या पावसाच्या ओळीवर पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मका लागवडीला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवारे गजबजली आहेत.
जिल्ह्यात जूनमधील पावसाची सरासरी १७४.४ मिमी आहे. मात्र शुक्रवारअखेर (ता. ३०) ९३.९ मिमी इतका पाऊस जिल्हाभरात झाला आहे. त्यामुळे ५३.८ तक्के पावसाची नोंद आहे. सरासरी इतका पाऊस न झाल्याने अद्याप जिल्ह्याच्या सर्वदूर भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात चालू महिन्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी महसूल मंडलात ३९२ मिमी तर सर्वांत कमी दुगाव (ता. चांदवड) महसूल मंडलात २४ मिमी इतका आहे.
जून महिन्यात मृग नक्षत्र कोरडे गेले तर अर्ध्या नक्षत्रात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या दिवसांचा आढावा घेतल्यास सर्वाधिक ११ दिवस पाऊस इगतपुरी तालुक्यात पडला तर काही ठिकाणी अवघे तीन दिवस पावसाची हजेरी आहे.
जिल्ह्याच्या भात उत्पादक पट्ट्यात पावसाचा जोर कायम असल्याने भात रोपे तयार करण्याची लगबग सुरू आहे. तर अनेक भागांत कामांना गती येत आहे. मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागात मालेगाव, नांदगाव, निफाड, सिन्नर, येवला व देवळा तालुक्यांत जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पूर्व भागातील या तालुक्यांतील काही भागांत यापूर्वी पाऊस झाला आहे. या पावसाच्या ओलीवर काही शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
मका लागवडीला यंदाही पसंती
गेल्या वर्षात मक्याला चांगला भाव असल्याने यंदाही या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. प्रामुख्याने येवला, देवळा या भागात शेतकऱ्यांकडून मका लागवडीची लगबग सुरू झाली आहे. मात्र मका बियाण्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जमिनीतील ओलावा पाहून पेरणी करावी
भारतीय हवामान विभाग-प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार १ ते ५ जुलै या कालावधीत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील.
ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला असेल त्या ठिकाणी वाफसा आल्यानंतर, जमिनीतील ओलावा पाहून तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
पावसाचा अंदाज लक्षात घेता भात रोपवाटिका, नवीन फळबाग व भाजीपाला पिकातून जास्तीचे पाणी काढून टाकावे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राने कळविले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.