.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai News : बदलापुरात दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शनिवारी (ता.२४) महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. मात्र, या बंदला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात शनिवारी दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन केले असले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी पुकारलेला बंद मागे घेण्याचे समाजमाध्यमावर म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अशा प्रकारे बंद घोषित करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असे निर्देश शुक्रवारी (ता. २३) दिले. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, की आम्ही विकृतीविरुद्ध हा बंद पुकारला आहे. आपली मुलगी शाळेत, कार्यालयात सुरक्षित राहील का, असा प्रश्न पालकांना पडला आहे. आम्ही या भीतीला वाचा फोडण्यासाठी बंद पुकारला आहे. तसेच दुपारी दोन वाजेपर्यंत
बस आणि रेल्वेसेवा बंद ठेवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. हा बंद केवळ महाविकास आघाडीचा नाही, तर सर्व नागरिकांच्या वतीने पुकारला गेला आहे. जात, धर्म, पंथ, भाषा या सीमा ओलांडून या बंदमध्ये सहभागी व्हावे. आजचा बंद कडकडीत असला तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. सणासुदीचे दिवस असल्याने दुपारी २ वाजेपर्यंत बंद पाळावा. या काळात दुकाने, रेल्वे, बस सेवा बंद ठेवायला हरकत नाही.’’
बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीबाबत ठाकरे यांना विचारले असता, शुक्ला यांना राज्याची ‘लाडकी बहीण’ होण्याची संधी आहे, असा टोला लगावला. त्या राज्याची लाडकी बहीण आहेत हे दाखविण्याची संधी त्यांना बंददरम्यान आहे. शनिवारी पुकारलेल्या बंदआड पोलिसांनी दादागिरी करू नये. तसेच हट्टाने बंदचा फज्जा होईल, असे कृत्य करू नये. अन्यथा, येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही. बंददरम्यान हिंसक घटना होऊ नये, असेही ते म्हणाले.
बंद पुकारल्यास कारवाई करा : उच्च न्यायालय
२४ ऑगस्ट रोजी बंद घोषित करणे बेकायदा असून, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. या वेळी न्यायालयाने अशा प्रकारे बंद घोषित करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच बंद घोषित करणे बेकायदा असून, जर कोणी अशा प्रकारे बंद पुकारतील त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.=
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.