
Jalgaon News : देशात कापूस पिकातील खर्च व उत्पादन याचा कुठलाही मेळ बसत नसल्याची स्थिती आहे. पीक आतबट्ट्याचे ठरू लागले असून, कुठलाही नफा त्यात हाती राहत नसल्याने पुढील हंगामात कापसाखाली क्षेत्रात मोठी घट होईल, असे दिसत आहे.
देशात कापसाची गुलाबी बोंड अळी, कमी व अधिक पाऊस, किडी व नैसर्गिक समस्यांमुळे वाताहत झाली आहे. चांगला उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक्षम कापूस वाण देशात नाही. अन्य देशांत कापूस उत्पादकता टिकून आहे किंवा भारतापेक्षा अधिक आहे. परंतु देशातील कापूस उत्पादकता व उत्पादन घट असून, शेतकऱ्यांना हे पीक तोट्यात नेत आहे. देशाची कापूस उत्पादकता सरासरी ३९० ते ४०० किलो रुई प्रतिहेक्टरी अशी यंदा राहणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
कारण उत्पादकतेस फटका बसला. पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना या भागांतील कापसाखाली कमाल क्षेत्र ओलिताखाली आहे. पण तेथेही कापूस उत्पादनाला रोगराई, गुलाबी बोंड अळीचा जबर फटका बसला असून, उत्तरेकडून देशात यंदा ४० लाख कापूसगाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढा पुरवठादेखील होणार नाही, अशी स्थिती आहे.
राज्यातील कापूस उत्पादकांची स्थिती बिकट
देशात सर्वाधिक ४२ ते ४२ लाख ५० हजार हेक्टरवर कापूस लागवड महाराष्ट्रात केली जाते. पण राज्यात मागील वेळेस कमी पावसाने व यंदा अतिपावसाने कापूस पिकास फटका बसला. राज्याची कापूस उत्पादकता अतिशय कमी किंवा हेक्टरी ३२५ ते ३३० किलो रुई प्रतिहेक्टरी एवढीदेखील यंदा राहणार नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे मजुरी, कृषी निविष्ठा यांचे दर वाढत आहेत.
कापूस दर मागील वेळेस सरासरी साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल, असे हाती आले. यंदा सहा हजार रुपये प्रतिक्विंटल, असा सरासरी दर देशातील कमाल कापूस उत्पादकांच्या हाती आला आहे. खर्च वाढला, दुसरीकडे दर मात्र घटले. हमीभाव अल्प शेतकऱ्यांना मिळत आहे. कापूस उत्पादकांचा नफा घटला. आता तोटा येत आहे.
कापूस पीक नुकसानकारक ठरत असल्याची स्थिती मागील दोन तीन हंगाम अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यामुळे देशातील कापसाखालील क्षेत्र २०२४-२५ मध्ये १२९ लाख हेक्टरवरून १२५ लाख हेक्टरवर आले. राज्यात सर्वाधिक कापूस लागवड करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र या हंगामात पाच लाख ६७ हजार हेक्टरवरून पाच लाख ११ हजार हेक्टर एवढे घटले. पुढे या क्षेत्रात आणखी मोठी घट होईल, कारण कापूस पिकात नफा दिसत नाही. पीक फक्त खते, कीडनाशके विक्रेते, बियाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांसाठीच लाभ देणारे ठरत आहे.
शेतकऱ्यांसाठी मात्र त्यात काहीच हाती उरत नाही, अशी नाराजी कापूस उत्पादक व्यक्त करीत आहेत. देशात जसे कापूस पिकाचे क्षेत्र कमी होत, असे तसे उत्पादनही दरवर्षी कमी होत आहे. देशात मागील हंगामात सुमारे ३२५ लाख कापूस गाठींचे उत्पादन झाले. यंदा सुमारे ३०५ ते ३१० लाख कापूस गाठींचे उत्पादन हाती येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह कापूस उद्योगासही बसू लागला आहे.
पूर्वहंगामी (बागायती) कापूस उत्पादन व खर्च, नफ्याचा ताळेबंद (सर्व बाबी एक एकरसाठी व रुपयांत)
ट्रॅक्टरने नांगरणी १५०० ते १८००
शेत भुसभुशीत करणे (रोटाव्हेटर) १२०० ते १३००
बियाणे ८६०
खते ६०००
कीडनाशके ३५००
मजुरी (तणनियंत्रण, खते देणे, कापूस लागवड, फवारणी आदी) - ७०००
पूर्वहंगामी (बागायती) कापूस उत्पादन व खर्च, नफ्याचा ताळेबंद (सर्व बाबी एक एकरसाठी व रुपयांत)
ट्रॅक्टरने नांगरणी १५०० ते १८००
शेत भुसभुशीत करणे (रोटाव्हेटर) १२०० ते १३००
बियाणे ८६०
खते ६०००
कीडनाशके ३५००
मजुरी (तणनियंत्रण, खते देणे, कापूस लागवड, फवारणी आदी) - ७०००
कापूस वेचणी मजुरी - ४०००
माल वाहतूक व इतर खर्च - १८००
कापसाचा एकूण खर्च (किमान)- २५ हजार ८६०
(या खर्चात शेतकऱ्याचा रोजचा मेहनताना गृहीत धरलेला नाही.)
कापूस उत्पादन तीन क्विंटल
- ६५०० रुपये प्रतिक्विंटल दरानुसार आलेले एकूण उत्पन्न १९५००
- शेतकऱ्याला एक एकर कापूस पिकात आलेला तोटा ६३६०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.