Akola News : यंदाच्या हंगामात खरीप, रब्बी पिकांना सुरुवातीला बदललेल्या वातावरणाचा फटका बसला. आता अर्धरब्बीत लागवड केलेल्या कांदा पिकावरही संकट तयार झाले. तेल्हारा तालुक्यात तळेगाव बाजार येथील शेतकरी प्रवीण खारोडे यांचे तीन एकरातील कांद्याचे पीक पूर्णतः जळून गेले आहे.
या वर्षात अवकाळी पाऊस, सततचे धुके आणि कीडरोगांनी सर्वच पिकांचे नुकसान झाले. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार शिवारात यंदा कांद्याची चांगली लागवड वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांतील सततच्या धुक्यामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. वातावरण बदल व धुक्यामुळे कांद्याचे पिक जळू लागलेले आहे.
तालुक्यात या वर्षी सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस आल्याने मूग, उडीद, सोयाबीन पिकांनी दगा दिला. नंतर तालुक्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे कपाशी, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापूस उत्पादनात मोठी घट झाली. पिकांच्या नुकसानाची मालिका संपायला नाव घेत नाही, अशी स्थिती आहे.
गेले काही दिवस तालुक्यात दररोज पहाटे धुके पडत असल्याने पिकांवर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची कीड वाढली. कांदा पिकावर करपा आल्याने शेतातील पूर्ण कांदा पिकाची पात वाळून गेली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.