
Solapur News : भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकमंगल शुगर इथेनॅाल ॲण्ड को-जनरेशन इंडस्ट्रिजने शेतकऱ्यांची थकित एफआरपी ३१ मे २०२५ अखेर पूर्णपणे अदा केलेली आहे. त्यामुळे कारखान्यावर आरआरसी कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आदेश रद्द करावेत, असे निवेदन लोकमंगल शुगरच्या वतीने साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले आहे.
चालू गळीत हंगामातील शेतकऱ्यांच्या थकित एफआरपीपोटी लोकमंगल शुगरने एफआरपीचे ५० कोटी ९ लाख ११ हजार रुपये थकवले आहेत. त्यामुळे साखर आयुक्त सालीमठ यांनी कारखान्यावर आरआरसी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले होते.
त्यानुसार कारखान्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. पण कारखान्याने ३१ मे अखेर शेतकऱ्यांची थकित एफआरपीसह सर्व देणी पूर्णपणे दिली आहेत. त्यामुळे ही कारवाई रद्द करावी, अशी विनंती साखर आयुक्तांना केली आहे.
शिवाय कारखान्याकडे दाखवण्यात आलेल्या ५० कोटी ९ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी कारखान्याने शेतकरीनिहाय किती रकमा दिल्या, याची यादीही या निवेदनासमवेत कारखान्याने जोडली आहे. कारखान्याकडे शेतकऱ्यांचा एकही रुपया देणे नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नाही, असे कारखान्याचे संचालक पराग पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
एफआरपीपेक्षा अधिक दर
यंदाच्या हंगामासाठी साखर कारखान्याची एफआरपी प्रतिटन २३३५ रुपये निघाली असताना कारखान्याने प्रत्यक्षात २८०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला आहे. या अतिरिक्त रकमेपोटी कारखान्याने १ कोटी ३८ लाख ८ हजार ४७ रुपये इतकी अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, असेही या निवेदनात निदर्शनात आणण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.