
शेतकरी : कुमार मच्छिंद्र सुर्वे
गाव : खोजेवाडी, ता. जि. सातारा.
एकूण शेळ्या : २५
शेळी जाती : उस्मानाबादी, शिरोही
कुमार सुर्वे यांची दोन एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीमध्ये सोयाबीन, ज्वारी, भुईमूग, गहू पिकांची लागवड होते. बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर नोकरी केली. मात्र अपेक्षित पगार मिळत नसल्याने काहीतरी शेतीपूरक व्यवसाय करायचे ठरविले. त्यातूनच २००५ मध्ये शेळीपालन करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला गावठी व उस्मानाबादी जातींच्या दोन शेळ्यांची खरेदी केली. घराच्या शेजारी छोट्या गोठ्यात त्यांचे संगोपन सुरू केले. या शेळ्यांना झालेल्या पाटा ठेवून बोकडांची विक्री केली जात होती. टप्प्याटप्प्याने ४५ शेळ्यांपर्यंत संख्या नेली होती. दरम्यानच्या काळात आजारपणामुळे शेळ्यांच्या संख्या कमी केली.
मागील १८ वर्षांपासून कुमार सुर्वे शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करत आहे. व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या अनुभवातून शिकत आवश्यकतेनुसार बदल करत गेले. शेळ्यांसाठी घराशेजारीच कमी खर्चात २५ बाय २८ फुटांचे पत्र्याचे शेड उभारले आहे.
सध्या त्यांच्याकडे २५ शेळ्यांचे संगोपन केले जात आहे. गोठ्यामध्ये पिले, बोकड, शेळ्या यांचे स्वतंत्र व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कप्पे केले आहेत. गोठ्यासमोरील २ गुंठे जागेत शेळ्यांना मुक्त पद्धतीने फिरण्यासाठी तारेचे कुंपण घालत मुक्तसंचार गोठा तयार केला आहे.
फार्ममध्ये मागणीनुसार बोकडांची वर्षभर विक्री केली जाते. वर्षाला साधारण १० ते १५ नगांपर्यंत विक्री होते. बोकडांची ५५० ते ६०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. या व्यवसायातून कुटुंबाचे आर्थिक गणित चांगले बसले आहे. यातूनच मिळालेल्या उत्पन्नातून २०१६ मध्ये घर बांधले आहे.
व्यवस्थापनातील बाबी
- शेळीपालन करताना प्रत्येक बाबींचे काटेकोर नियोजन केले जाते. त्यामुळे शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
- गोठ्यातील कामांस सकाळपासून काम सुरू होते. सुरूवातील शेळ्या बाहेर काढून गोठा स्वच्छ केला जातो. शेळ्या मुक्त संचार गोठ्यात सोडल्या जातात.
- शेळ्यांना वर्षभर हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे नियोजन केले जाते.
- सुक्या चाऱ्यात कडबा, सोयाबीन भुसकट तर ओल्या चाऱ्यामध्ये मका, सुबाभूळ, हत्तीघासाचा वापर केला जातो.
- थंडीच्या दिवसांत गोठ्याच्या सर्व बाजू बंदिस्त ठेवण्यावर भर दिला जातो. जेणेकरून थंड वारे गोठ्यात येऊन शेळ्यांना थंडी लागत नाही.
- उन्हाळ्यात गोठा कोरडा ठेवण्यावर भर दिला जातो. यामुळे आजार कमी होण्यास मदत होते.
- दररोज दुपारी एक ते सांयकाळी सहापर्यंत शेळ्या चरण्यासाठी डोंगरात नेल्या जातात.
लहान पिलांची काळजी
- पिले जन्मल्यानंतर त्यांना स्वच्छ केले जाते. नाळ व्यवस्थित कापून आयोडीन लावले जाते.
- नवजात पिलांची सुरुवातीचे १५ दिवस विशेष काळजी घेतली जाते.
- प्रत्येक लहान पिलास १५ दिवस तीन वेळा दूध पाजले जाते.
- थंडीच्या काळात पिल्लांना उबदार वातावरण ठेवले जाते.
आरोग्य व्यवस्थापन
- शेळ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी वेळापत्रकानुसार त्यांना लसीकरण केले जाते.
- दर तीन महिन्यांनी जंतनाशकाची गोळी दिली जाते.
- लसीकरण केल्यावर किमान चार तास कोणताही चारा किंवा खाद्य दिले जात नाही.
- आजारी शेळ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते.
- गाभण शेळ्या आणि नवजात पिलांना वेगळे ठेवून त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
विक्री नियोजन
- बोकडाची विक्री वर्षभर सुरू असते.
- मागणीनुसार जागेवरूनच थेट विक्री तसेच नगावर विक्री केली जाते.
- सण आणि उत्सवांच्या दृष्टीने विक्रीसाठी काही बोकडाचे स्वतंत्र व्यवस्थापन करून संगोपन केले जाते. जेणेकरून चांगले दर मिळण्यास मदत होईल.
संपर्क - कुमार सुर्वे, ९९७०७८७९३८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.