
आंबा (Mango)
फुलोरा ते फळधारणा अवस्था.
फुलकिडींचा प्रादुर्भाव
सध्या कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत असून, ती फुलकिडींच्या (थ्रीप्स) वाढीसाठी पोषक असते. या किडीचा आंबा मोहर आणि फळांवर प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. ही कीड कोवळ्या सालीचा भाग खरवडत असल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात.
मोहराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात व मोहर काळा पडून गळून जातो. फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळाची साल खरवडल्यासारखी दिसते. फळांवर खाकी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात. लहान फळांची गळ होते.
फुलकिडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) ०.२५ मि.लि.
प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास ८ ते ९ दिवसांनी दुसरी फवारणी
थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.२ ग्रॅम.
(टीप : किडीचा संपूर्ण जीवनक्रम १५ दिवसांमध्ये पूर्ण होत असल्याने नियंत्रणासाठी दुसरी फवारणी लगेचच घेणे आवश्यक असते.)
फळगळ
आर्द्रतेत घट आणि बाष्पीभवनात वाढ झाल्याने आंबा झाडाला ताण बसू शकतो. त्यामुळे फळगळ होणे, प्रखर सूर्यकिरणामुळे फळे भाजणे किंवा फळे तडकणे अशा शक्यता असतात.
पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी द्यावे.
बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
वाढत्या तापमानामुळे आंबा फळांची होणारी गळ थांबविणे, फळांची प्रत सुधारणे यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना साधारणत: १० ते १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
ज्या आंबा झाडांना पुरेशी फळधारणा झाली असून, पुन्हा मोहर आल्यास अन्नाचे वहन नवीन मोहराकडे होते. त्यामुळे जुन्या मोहराला असलेली वाटाणा ते अंडाकृती आकाराच्या फळांची गळ होण्याची शक्यता असते.
त्यामुळे झाडाला फळधारणा झाल्याची खात्री असल्यास जिबरेलिक ॲसिड या संजीवकाची ५० पी.पी.एम. म्हणजेच १ ग्रॅम प्रति २० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी झाडावर करावी. जिबरेलिक ॲसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असल्याने प्रथम ती थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून घ्यावी व नंतर पाण्यात मिसळावी.
फळमाशी
आंबा फळांचे फळमाशी आणि प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी गोटी ते अंडाकृती आकाराची फळे असताना २५ × २० सें.मी. आकाराची कागदी/ वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळे मिळू शकतात.
आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. त्यापासून संरक्षणासाठी रक्षक फळमाशी सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावेत.
या सापळ्यात ठेवलेले रासायनिक खाद्य आमिष (मिथाईल युजेनॉल) ६ ते ७ आठवड्यांपर्यंत चालते. मात्र त्यानंतर परत २ ते ३ मि.लि. खाद्य आमिष (मिथाईल युजेनॉल) जाळीदार डब्यात ठेवलेल्या बोळ्यात घालावे. खालील साबणाचे पाणी आवश्यकतेनुसार बदलावे.
तुडतुडे प्रादुर्भाव
मोहर/फळधारणा अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. तुडतुडे मोहरातील, कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहराची गळ होते.
त्याच प्रमाणे त्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या मधासारखा तुडतुड्यांची आर्थिक नुकसानीची पातळी, पालवी/मोहर अवस्था > ५ तुडतुडे प्रति पालवी/मोहर.
ती ओलांडली असल्यास कीटकनाशकाची फवारणी करण्यात यावी.
फवारणी प्रति लिटर पाणी
अ) बोंगे फुटण्याच्या अवस्थेत, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.
ब) मोहर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत, इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. किंवा ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि.
क) वाटाणा अवस्थेत असताना, थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम.
मोहर अवस्थेत असलेल्या आंब्यामधील परागीकरण वाढविण्यासाठी मोहर फुललेल्या अवस्थेत असताना सकाळच्या वेळेस (सकाळी ९ ते १२ वा.) हलका हलवून घ्यावा. फळधारणा झालेल्या झाडावरील मोहरातील सुकलेल्या अवस्थेतील नर फुले दुपारच्या वेळेस कडक उन्हामध्ये झाडून घेतली असता कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. कीटकनाशकाची फवारणी अधिक प्रभावी होऊन फळांची वाढ चांगली होते.
टीप : मोहर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी.
फवारणी करणे गरजेचीच असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून (सकाळी ९ ते १२) फवारणी करावी. कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी.
या अगोदर फवारणी घेतली असल्यास कीड व रोगाच्या प्रादुर्भावासाठी झाडाचे निरीक्षण करावे. आवश्यकता असेल तरच उपाययोजना कराव्यात.
भुरी रोग
सध्या रात्रीचे तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत आहे. हे भुरी रोगाच्या वाढीसाठी पोषक असून तिसऱ्या टप्प्यातील मोहर आणि नुकतीच फळधारणा झालेल्या आंबा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.
त्याच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी. हेक्झाकोनाझोल (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि.
संपर्क - ०२३५८- २८२३८७, ८१४९४६७४०१ (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.