
Chhatrapati Sambhajinagar News : पावसाळ्यात कालावधीत आपतकालीन परिस्थितीत संपर्क यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी मराठवड्यातील जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत व सज्ज ठेवा, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात सोमवारी (ता. १५) विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांच्या मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनीष कलवानिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वसंत गालफाडे, ‘महवितरण’चे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्यासह सबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
केंद्रेकर म्हणाले, की आपत्तीपूर्व नियोजन करताना यंत्रणा अद्ययावत असावी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. माहिती देणारी साखळी तत्पर ठेवतानाच जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्वदूर संपर्कसातत्य ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही संदेशाला दुर्लक्षित करू नका, आपला दूरध्वनी बंद राहणार नाही याची काळजी घ्यावी.
गावातील अंगणवाडी सेविका ते गावात कार्यरत असलेल्या यंत्रणेला विश्वासात घेत गावपातळीवर सातत्याने संपर्कात राहा. गोदाकाठच्या जिल्ह्यांनी विशेष काळजी घ्यावी. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व नांदेड या जिल्हयांनी गोदावरी नदीबाबत दक्षता राखणे गरजेचे आहे.
या जिल्ह्यांनी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील पाऊसस्थितीचा दैनदिन आढावा घ्यावा. जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी समन्वयाने काम करावे.
आपत्ती कालावधीत काम करताना तलाव, रस्ते, घरे व वीज यंत्रणा याबाबत सातत्याने आढावा घ्यावा. वेळीच दक्षता घेतली तर आपत्तीच येणार नाही, असे काम करा. पावसाळ्यात साथरोग वेगाने पसरतात. साथरोगांची संभाव्यता लक्षात घेता औषधांचा मुबलक प्रमाणात साठा ठेवावा, निवारा केंद्रे, अन्नपुरवठा व बोटी याबाबतही दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
महावितरण विभागाने ग्रामीण व शहरी भागात आपातकालीन परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी नियोजन करावे. नदीलगतच्या तसेच प्रकल्पाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील नागरी वस्तींना धोका निर्माण झाल्यास आधीच त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचाव पथके तयार ठेवावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.