
Karjat News : कर्जत तालुक्यातील सावळे गावात जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली घरगुती नळजोडणी योजना रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. दोन महिन्यांपासून गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यासंदर्भात वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारी करूनही कुठलीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला आणि प्रशासनाला आठवडाभराची अंतिम मुदत दिली आहे.
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून महिलांना पाणीटंचाईमुळे विहिरीवर जाऊन पाणी भरावे लागत आहे, मात्र विहिरीतील पाणीही आता आटल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. ग्रामसेवक व प्रशासकांकडून वारंवार आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही.
त्यामुळे महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत निषेध नोंदवला. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाला, तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. यासंदर्भात तहसीलदार व बीडीओ यांना लेखी निवेदन दिले आहे. जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीबाबत चौकशीची मागणीही करण्यात येत आहे.
फार्महाउसना अवैधपणे नळजोडणी
ग्रामस्थांच्या मते, जल जीवन मिशनचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असले तरी अद्याप अपूर्ण आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्याचा फटका थेट ग्रामस्थांना बसत आहे. गावातील काही फार्महाउसना अवैधपणे नळजोडणी दिल्याने मुख्य पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. परिणामी अनेक घरांमध्ये अजूनही पाणी पोहोचलेले नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.