Irrigation Issue: जायकवाडी धरणाच्या पाणी फुगवट्यामुळे गेल्या २० वर्षांपासून अमळनेर-लखमापूर (ता. गंगापूर) परिसरातील शेती पाण्याखाली जात असून उभी पिके मातीमोल होत आहेत. प्रशासनाकडून सातत्याने वेळकाढूपणा केला जात असल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १८) रखरखत्या उन्हात अमळनेर शिवारात जलसमाधी आंदोलन सुरू केले..शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, की जायकवाडीच्या पाणी फुगवट्यामुळे दरवर्षी पिकांचे शंभर टक्के नुकसान होत आहे. मात्र, याबाबत जलसंपदा विभाग ‘फाईल भूमी अभिलेख विभागाकडे आहे’ असे सांगतो, तर भूमी अभिलेख विभाग ‘आमचा संबंध नाही’ असे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. न्याय मिळावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले..Jayakwadi Dam Backwater : असंपादित क्षेत्रात जायकवाडीच्या बॅक वॉटरचे पाणी .सोमवारी (ता. १८) सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतकरी कुटुंबीयांसह चिखल आणि पाण्यात उतरले. गोदामाईचे पूजन करून त्यांनी थेट पाण्यात उभे राहत आंदोलन सुरू केले. डोक्यावर रखरखते ऊन, पायात काटे, अंगावर किडेमुंग्या अशी बिकट परिस्थिती असतानाही शेतकरी ठामपणे आंदोलन करत राहिले. वृद्ध शेतकऱ्यांचे पाय चिखलात रुतत होते, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली..शेतकऱ्यांनी सांगितले, की गेल्या पाच वर्षांत हे पाचवे जलसमाधी आंदोलन आहे. प्रत्येक वेळी लेखी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. जलसंपदा विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांच्यातील उडवाउडवीमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली..Ahilyanagar Dams Water Level: अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत ३५ टक्क्यांवर पाणीसाठा.दुपारनंतर प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता दीपककुमार डोंगरे तसेच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना एफटीएलची मर्यादा स्पष्ट करणे, हद्दीच्या खुणा करणे, नुकसान भरपाई देणे तसेच संपादनाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांकडे ठोस उत्तरे नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला..“वीस वर्षांपासून पिकांचे नुकसान होत आहे. पाच वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत; मात्र प्रशासनाने एकही आंदोलन गांभीर्याने घेतले नाही. आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही,” अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली. या आंदोलनात इसाभाई पठाण, राधेश्याम कोल्हे, बालचंद पंडित, कडूबाबा पठाण, शिवाजी दरगुडे, समद पठाण, विक्रम पंडित, मुनीर पठाण, जनार्धन मिसाळ, भाऊसाहेब पंडित, गणेश मिसाळ यांच्यासह सुमारे ३० शेतकरी सहभागी झाले होते..पाटबंधारे विभागाचे उपअभियंता दीपककुमार डोंगरे यांनी “संपादनासंदर्भातील कागदपत्रे शोधून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला,” असे सांगितले. मात्र शेतकऱ्यांनी हे स्पष्टीकरण फेटाळून लावत आता प्रत्यक्ष कृतीची मागणी केली. दरम्यान, हे आंदोलन रात्रभर सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.