
New Delhi News : भारतातील कृषी क्षेत्राची वाढ जगात सर्वांत वेगाने होत असून, २०३५ पर्यंत कृषी अर्थव्यवस्था १.४ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचू शकेल. तसेच याच वेगाने वाढ कायम राहिली, तर २०४७ पर्यंत ३.१ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला जाईल, असा अंदाज मॅकेन्झी या जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनीने व्यक्त केला आहे.
मॅकेन्झीने ‘व्हॅल्यू क्रिएशन इन इंडियन अॅग्रिकल्चर’ या अहवालात भारतीय कृषी क्षेत्राबद्दलची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामध्ये कृषी क्षेत्रातील संरचनात्मक बदलांसह संधींकडे लक्ष वेधले आहे.
मोठा ग्राहक वर्ग, कमी उत्पादन खर्च, कच्च्या मालाची मुबलक उपलब्धता, डिजिटल पायाभूत सुविधा आणि नवोन्मेष शक्तीचा कृषी क्षेत्राच्या उभारीसाठी फायदा करून घेता येऊ शकतो. तर जैव-इंधन, अन्न प्रक्रिया, कृषी रसायने आणि जैविक कृषी उत्पादन या क्षेत्रात विशेष संधी निर्माण झाल्या आहेत, असे मॅकेन्झीने म्हटले आहे.
सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित कायदे, योजना आणि प्रक्रियेत सुधारणा केल्या आहेत. तसेच बाजार, व्यवहार आणि तंत्रज्ञान अधिक नियोजित आणि नियमित पद्धतीने विकसित केले आहे. परंतु भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच विविध पिकांची लागवड केली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या पुरवठा साखळी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, कृषी क्षेत्रासाठी एकसूरी उपाय लागू करणे जोखमीचे ठरतं, याकडे मॅकेन्झीने या अहवालात लक्ष वेधले आहे.
‘संरचनात्मक सुधारणांपासून ते डिजिटल तंत्रज्ञान नवोन्मेषांपर्यंत अनेक अंतर्गत आणि बाह्य घटकांनी मिळून भारताला कृषी क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनवले आहे.
त्यामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये भारताची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे,’ असे या अहवालात नमूद केले आहे. भारताच्या कृषी मूल्यसाखळीत ४० व्यवसाय क्षेत्रांमध्ये सर्वाधिक वाढीची शक्यता आहे. त्यातून ५३३ अब्ज डॉलर्स महसूल आणि ४२ अब्ज डॉलर्स निवळ नफा मिळेल, असा दावा या अहवालात केला आहे.
संधी कोणत्या क्षेत्रात?
भारताची जैव-अर्थव्यवस्था २०१४ मधील १० अब्ज डॉलर्सवरून २०२४ मध्ये १६५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. बायोइथेनॉल आणि बायो-ब्युटानेडायॉल यांसारख्या उत्पादनांत मोठी संधी आहे. त्यासाठी स्वस्त व शाश्वत कच्चा माल पुरवठा, योग्य उत्पादन केंद्रांची निवड आणि लवचिक संयंत्र रचना गरजेची आहे. तसेच सध्या भारतात पीक संरक्षणासाठीच्या कृषी रसायनांचा बाजार ४ अब्ज डॉलर्स असून, त्यामध्ये ३ ते ५ टक्के दराने वाढ होत आहे.
तर कृषी रसायन निर्यात बाजार ५.५ अब्ज डॉलर्स आहे. त्यामध्ये ५ ते ६ टक्के वाढ होते आहे. २०४७ पर्यंत एकत्रितपणे हा बाजार २५-३० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकतो, असेही मॅकेन्झीने म्हटले आहे.
तसेच जैव उत्तेजके, जैविक खते, जैविक नियंत्रके यांचा वापर वाढू लागला आहे. या क्षेत्रात दरवर्षी ९-१० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. हा बाजार २०२४ मध्ये ३५० दशलक्ष डॉलर्स असून, २०३० पर्यंत ६०० ते ६४० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. तर सध्या सुमारे ३३० अब्ज डॉलर्स मूल्य असलेल्या कृषी प्रक्रिया क्षेत्रामुळे आर्थिक मूल्यनिर्मितीला चालना मिळत आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.