Solapur News : उन्हाळ्यात ही बागायत व्हावे, उत्पादन वाढावे व पाणी टंचाईवर मात व्हावी, यासाठी मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेततळे घेण्याकडे कल वाढला आहे. आतापर्यंत तालुक्यात १५५८ पर्यंत शेततळी झाली असून, या वाढत्या शेततळ्यामुळेच तालुक्यात यंदा सुमारे २ हजार १०० एकरांवर फळबागांची लागवड झाली आहे.
निसर्गाचा लहरीपणा, वेळेवर न पडणारा पाऊस यामुळे उसासारखी जादा पाण्याची पिके घेणे अडचणीचे होत आहे. शेततळ्या अगोदर पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी व बोअर यांचा वापर केला जात होता.
आजही तो सुरू आहेच. मात्र उन्हाळा सुरू झाला की विहीर व बोअरची पाणीपातळी खालावते त्यामुळे शेती बागायती करण्यावर मर्यादा येत असे. मात्र या अडचणीवर मात म्हणून शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून तसेच काहींनी स्वखर्चाने शेततळी खोदली आहेत. मोहोळ तालुक्यात एकूण १५५८ शेततळी आहेत. त्या माध्यमातून ९ हजार ३४८ टीसीएम इतका पाणीसाठा झाला आहे.
शेतकऱ्यांनी घेतलेली ही शेततळी विविध आकारांत आहेत. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होतो आहे. उजनी कालव्याला पाणी आल्यावर अनेक शेतकऱ्यांनी शेततळी भरून घेतली आहेत, तर अनेक शेतकरी विहिरीचे व बोअरचे पाणी शेततळ्यात सोडतात. जमिनीत पाणी मुरू नये, यासाठी शेततळ्यात अनुदान पद्धतीवर प्लॅस्टिक कागद टाकण्याची ही सोय आहे.
एकदा शेततळे भरले की पावसाळ्यापर्यंत फळबागा ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून जिवंत ठेवण्यास मदत होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. आतापर्यंत २ हजार १०० एकरांवर सुमारे ३३१ शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली आहे. त्यात केळी, डाळिंब, पेरू यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.