History of Farming: सजीव सृष्टीची उत्क्रांती हे एक अनाकलनीय महानाट्य आहे. साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. मग पुढे उत्क्रांतीच्या एका टप्प्यात मानव कुळाचे पूर्वज झाडावरून पाय-उतार झाले व ३४ लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या माळरानांवर दोन पायांवर आदिमानव उभा राहिला. थोडक्यात या महानाट्याच्या अगदी शेवटच्या भागात लाडक्या शेंडेफळ मानवाचा प्रवेश झाला. सर्वसाधारणपणे दहा हजार वर्षांपूर्वी माणूस हा इतर प्राण्यांसारखाच शिकारी होता. सृष्टी-व्यवस्थेचा एक भाग होता. अभ्यासकांच्या मते, एक कोटी आदिमानव पृथ्वीवर शिकार करत जगत होता. आज घडीला केवळ काही लाख लोक शिकार करुन जगतात. आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अगदीच अल्प असे (अदमासे) केवळ ०.००३ टक्का असावे. .मानवी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांत सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी कृषी संस्कृती उदयाला आली. पण एका जागी स्थिर झाल्यानंतर शेती व्यवस्था विकसित करायला आद्य शेतकऱ्यांना तब्बल चार-साडेचार हजार वर्षे खर्ची करावे लागले, या दरम्यान मोठा संघर्ष त्याला करावा लागला. या आद्य शेतकऱ्यांच्या वसाहती जगभर मिळतात. तशा त्या भारतीय उपखंडात पण आहेत. महाराष्ट्रात तापी, गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा, कृष्णा इत्यादी नद्यांच्या काठी आद्य शेतकऱ्यांच्या वसाहती पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासकांना मिळाल्या आहेत. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या संग्रहालयात आद्य शेतकऱ्यांची जीवनशैलीचे दर्शन होते. First Farmers of the Deccan हे डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांचे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे. महाराष्ट्र देशीची ही कृषी संस्कृती विविध अंगांनी नटलेली आहे. स्थानिक पर्यावरणाच्या आधारे येथील आद्य शेतकऱ्यांच्या हजारो पिढ्यांनी निर्माण केलेली प्रदेशनिष्ठ पिके व पाळीव प्राणी, ही या भूमीला लाभलेली देणगी म्हणता येईल. आपल्या राज्याच्या कृषी संस्कृतीचा उभा आडवा धांडोळा घेतला तर तिच्यातील वैविध्यता विस्मय चकित करते..Human Forest Relation: जन-वन साहचर्यासाठी ठोस कृतीची गरज.महाराष्ट्राची कृषी-व्यवस्थाआपण महाराष्ट्रातील कृषी-व्यवस्थेचा मागोवा घेऊ. देशपातळीवर हवामान आधारित एकूण पंधरा कृषी हवामान विभाग आहेत. तसे महाराष्ट्रातील माती, पाऊस, हवामान या पर्यावरणीय घटकांच्या आधारे एकूण नऊ कृषी हवामान विभाग अभ्यासकांनी निश्चित केले आहेत. शासकीय यंत्रणेने केलेले हे मुलभूत स्वरूपाचे पायाभूत असे महत्कार्यच आहे. पश्चिमेला समुद्र किनारी असणारा कृषी विभाग म्हणजे कोकण, त्यांनतर सह्याद्री पर्वतराजीतील डोंगराळ व जंगलाने वेढलेला अति पावसाचा शेती प्रदेश म्हणजे ‘पश्चिम घाट’. दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीला पूर्वेकडे जाणारे अनेक फाटे आहेत, त्या उपरांगांच्या प्रदेशातील शेती, पुढे ऐन दख्खनच्या पठारावरील जिरायती शेतीचा अर्ध शुष्क (दुष्काळी प्रदेश) विभाग. दुष्काळी मराठवाडा, मध्यम पर्जन्यमानाचा पश्चिम विदर्भ व भरपूर पाऊस पडणारा पूर्व विदर्भ, असे हे एकूण नऊ कृषी हवामान विभाग; तळ कोकणापासून गडचिरोलीपर्यंत निश्चित केले आहेत. या एक प्रकारे आपल्या राज्याच्या ढोबळ कृषी- सृष्टी-व्यवस्था (परिसंस्था)आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..शेती पद्धतआजच्या वर्तमान पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध कृषी हवामान विभागात शेती कशी कसली जाते, याचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील कोकण पट्टी दोन उपविभागांत विभागली जाते. एक मुंबईच्या उत्तरेला असणारा ठाणे व पालघर जिल्ह्यांचा भूभाग. दुसरा मुंबईच्या दक्षिणेला रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मोडणारा प्रदेश ते दक्षिण कोकण. कोकणातील दोन्हीही विभागांत भात हे मुख्य पीक आहे. समुद्राच्या कडेला केळी, नारळ, सुपारीच्या वाड्या (बागा) आढळतात. दक्षिण कोकणातील हापूस आंबा व काजू प्रसिद्ध आहेत. कोकणी शेतकरी जमिनीच्या मशागतीसाठी कोकण गिड्डा (कपिला) हा बुटका गोवंश पाळतो..कोकणातीलच सह्याद्रीच्या घाट पालवातील खेड्यात आदिवासी व समुदाय मुख्य पीक भातासोबत नागली, वाल यांसारखी पिके घेतात. सोबत अति पावसात मशागतीसाठी डांगी गोवंश पाळतात. वर घाटमाथ्यावर सह्याद्रीच्या रांगांमध्ये व उत्तरेला पसरलेल्या सातपुड्यात भरड धान्य व भाताची विविध वाण पिकवतात..सह्याद्रीच्या पूर्वेला मध्यम ते कमी पावसाच्या प्रदेशात ‘इरवड’ व ‘माळीव’ या मिश्र पीक पद्धती प्रचलित आहेत. बाजरी, ज्वारी, मूग, भुईमूग, उडीद, मठ, तसेच हरभरा, गहू ही पिके घेतात. माळवात विविध भाजीपाला पिकवितात. अशा या शुष्क भागात मोठ्या जमीन क्षेत्राची मशागत करण्यासाठी खिलार उपयुक्त ठरते..खानदेश, मराठवाडा व पश्चिम विदर्भात ज्वारी हे पीक मुख्य होते. जोडीला करडई, तूर पण घेत असत. येथील शेतकरी प्रामुख्याने माळवी, लाल कंधारी व गौळाऊ नावाचा देशी गोवंश पाळतात. पूर्व विदर्भातील अति पावसाच्या जिल्ह्यांत साहजिकच भाताचे पीक घेतले जाते व जोडीला कडधान्याची ‘कठाण’ शेती केली जाते..Gouda Cheese History: झान्से स्कान्स ते गौडा चीज : कृषी पर्यटन, मूल्यवर्धनाचा प्रवास.एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर येथील कृषिवल समाजाने मागील हजारो वर्षांच्या कालखंडात, स्थानिक हवामान आधारित प्रदेशनिष्ठ कृषी व्यवस्था उभी केली आहे. बहुविध पिके, पाळीव प्राणी यांच्या आधारे अन्नसुरक्षा जपण्याचे कार्य केले आहे. एकूणच महाराष्ट्रातील शेतीचे स्वरूप हे विविधांगी आहे. आदिवासी बहुल प्रदेशातील शेती ही वन-परिसंस्थेवर आधारलेली आहे. सपाट माळरान असणाऱ्या परिसंस्थेतील शेती ही पशुपालन आधारित आहे व जल परिसंस्था आधारित शेतीचे एक वेगळे पण आपल्या राज्यात आढळते..बदलणारी ‘प्रदेशनिष्ठ’ शेतीमहाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक विभागातील पारंपरिक शेतीची आपण चर्चा केली. पण आज घडीला हे चित्र बदलत आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, संकोचित होणारे जमीन क्षेत्र, रोकड पैसा देणारी मोजकी नगदी पिके व जोडीला हरितक्रांतीच्या रेट्यातून येऊ घातलेली आधुनिक शेती (?), यामुळे मागील पाच दशकांत हजारो वर्षांच्या संचितातून विकसित झालेली प्रदेशनिष्ठ शेती व्यवस्था कोलमडली आहे. विदर्भ, कोकण व घाटमाथ्यावरील भात शेतीचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्राची पीक पद्धत पूर्णत: बदलली आहे. एकेकाळी पश्चिम विदर्भ, मराठवाडा व खानदेशात ज्वारी हे राजा पीक होते. त्या जागी सोयाबीन व कपाशी आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक हे जिल्हे बाजरी व कडधान्यांचे आगार होते. तिथेही फक्त पैसा कमावण्यासाठी डाळिंब, द्राक्षे, कांदा व सोयाबीन खालील क्षेत्र वाढतच आहे. दक्षिण महाराष्ट्र पण याला अपवाद नाही. थोडक्यात, स्थानीय पर्यावरणाचा विचार न करता शेती होत आहे. शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या जल-जमीन-जंगल-पशू-पक्षी-मधमाश्या व मानव या मूलभूत घटकांकडे दुर्लक्ष होते आहे..धरणांची मालिका व दुष्काळग्रामीण व नागरी विकासासाठी, तसेच पूर व्यवस्थापनासाठी सह्याद्रीत हमखास पावसाच्या भागात मोठी धरणे निर्माण झाली. जोडीला सपाट भागात उजनी व जायकवाडी असे अवाढव्य (तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या जागी) प्रकल्प निर्माण केले. स्थानिक परिसंस्था व भूविज्ञान याचा तर विचारच झाला नाही. लाखो शेतकरी कुटुंब विस्थापित झाले. नदी काठची सुपीक जमीन पाण्याखाली बुडाली. धरणांचा उद्देश ओलिताखालील क्षेत्र वाढवणे हा होता. पण प्रत्यक्षात उलटेच घडले. सत्तेच्या राजकारणासाठी सहकारी साखर कारखानदारीचा वापर सुरू झाला. धरणाच्या पाण्यावर फक्त उसाचे मळेच फुलवायचे, त्याने राज्याचा विकास होईल, अशी भ्रामक आशा पण निर्माण केली गेली..आज घडीला धुळे जिल्ह्यातील साक्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळपर्यंत धरणे व कालव्यांच्या आधारे पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. राज्यात सहकारी व खासगी असे दोनशेपेक्षा अधिक साखर कारखाने गाळप करत आहेत. ऊस शेतीचे हे लोण वर्षानुवर्षे दुष्काळग्रस्त भागात पोहोचले, हे चित्र अधिक चिंताजनक आहे. एकूणच साखर उद्योग हा माती पाणी यांच्या प्रदूषणासह सामाजिक. आर्थिक, पर्यावरणीय शोषण करतो आहे, हे मान्य असूनही त्यात कालसुसंगत सुधारणा अथवा पुनर्विचार होताना दिसत नाही..ज्येष्ठ जलतज्ज्ञ दिवंगत विलासराव साळुंखे यांनी तीस वर्षांपूर्वी धोक्याचा इशारा दिला होता. ऊस शेतीमध्ये सुमारे सत्तर टक्के पाणी केवळ साडेतीन टक्के क्षेत्रावर वापरले जाते, पाण्याच्या असमान वाटपातून आपण कोणता शाश्वत विकास साधणार आहोत...? या मांडणीकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. आज राज्यातील दुष्काळी व अवर्षणप्रवण तालुक्यांची संख्या वाढतच आहे..सहकारी चळवळीमधील द्रष्ट्या नेत्यांनी साखर उद्योगासोबत दूध व्यवसायाला चालना दिली, कापूस गिरण्या उभारल्या. छोट्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. पण सहकाराचा प्रभावी वापर इतर पिकांसाठी झाला नाही. ती पिके, पिकवणारे शेतकरी आणि तो प्रदेश दुर्लक्षित व मागास राहिला..स्थानीय सृष्टी-व्यवस्थेचा विसरस्थानिक पर्यावरणीय घटकांचा विचार न करता, पारंपरिक शेतीला कुचकामी ठरवून पूर्णत: नवीन बागायती शेती व पशुपालन व्यवस्थेचा आपण पुरस्कार केला. ती खरोखर महाराष्ट्राच्या सर्व विभागांना उपयुक्त ठरणारी होती का? त्याचा लाभ खरोखर किती शेतकऱ्यांना झाला? या पार्श्वभूमीवर विदर्भ-मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप काही सांगून जातात. नैसर्गिक शेती ते रासायनिक शेती व आजघडीला अत्याधुनिक अशी उच्च तंत्रज्ञान, तसेच AI आधारित शेतीची चर्चा सुरू आहे. या स्थित्यंतरांच्या पार्श्वभूमीवर आपली शेती पर्यावरणीय व आर्थिकदृष्ट्या खरच शाश्वत होणार आहे का? अन्नसुरक्षेसाठी शेती की ऊर्जा निर्मितीसाठी, असं त्रांगड निर्माण होऊ पाहत आहे..एकूणच मानव व शेती यांच्यातील जैव-सांस्कृतिक नाते बदलत आहे. ते अधिक व्यावहारिक होत आहे. त्यापेक्षा ते अधिक शोषण करणारे होत आहे. या सर्व वास्तवाचे व त्यातील गुंतागुंतीचे तटस्थ अवलोकन व्हायला हवे. या दृष्टीने आपले शेतकरी, धोरणकर्ते, राज्यकर्ते, सरकारी कृषी यंत्रणा, परिसर व अर्थशास्रज्ञ, अभ्यासक, कार्यकर्ते आदी घटक काही विचार वा कृती करणार आहेत का? पर्यायी शाश्वत विकास नीती मांडणार आहेत का?९४२१३२९९४४vijaysambare@gmail.com(लेखक शेती, पशुपालन व शाश्वत विकास या विषयांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.