
Sangli News : सांगली जिल्ह्यात द्राक्षपिकाखालील क्षेत्र सव्वा लाख एकर असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे म्हणणे आहे. तर कृषी विभागाकडील माहितीत ७७ हजार एकराची नोंद आहे. मग सांगली जिल्ह्यातील द्राक्ष पिकाखालील एकूण क्षेत्र किती, संघ आणि कृषी विभाग यांच्या आकडेवारीत इतकी तफावत कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सांगलीसह नाशिक, पुणे, सोलापूर या विभागांतील द्राक्ष क्षेत्राच्या आकडेवारीतही मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. या गोंधळाचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसत असून, यामुळेच नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान बऱ्याचदा नुकसान भरपाईपासूनही वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. द्राक्ष बागायतदार संघ आणि कृषी विभाग यांनी तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी राज्यभरातील द्राक्ष उत्पादक करीत आहेत.
राज्यात सद्यःस्थितीला साडेचार लाख एकरांवर द्राक्ष पिकाचे क्षेत्र विस्तारले आहे. सांगली, पुणे, नाशिक आणि सोलापूर असे चार द्राक्ष संघांचे विभाग आहेत. या चारही विभागांमध्ये द्राक्ष पिकाचे क्षेत्र अंदाजेच असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक शेतकरी नवीन द्राक्ष लागवड करतात. बहुतांश शेतकरी सातबाऱ्यावरील पीक पेऱ्यात द्राक्ष पिकाची नोंद करतात.
मात्र त्यासंदर्भात कृषी विभागाकडे अचूक आकडेवारी उपलब्ध नाही. द्राक्ष पिकाचे अचूक क्षेत्र कृषी विभागही संबंधित विभागाकडून घेत नाही. राज्यात शरद सीडलेस, ज्योती, एस. एस. माणिक चमक, सुपर सोनाका, थॉमसन, तास-ए-गणेश, सोनाका यांसह अनेक वाणांच्या लागवडी आहेत. तसेच अलीकडच्या काळात नॉन पेटेंट, पेटेंट वाणांची लागवड झाली आहे. मात्र प्रत्येक वाणाचे क्षेत्र किती आहे, याबाबतची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यात द्राक्षाचे क्षेत्र किती आहे, याचाही अचूक अंदाज लावणे कठीण आहे. आजअखेर द्राक्षाचे क्षेत्र अंदाजेच गृहीत धरले जात आहे.
क्षेत्रात तफावत
द्राक्षाच्या क्षेत्राचे उदाहरण द्यायचे झाले तर, सांगली जिल्ह्यात कृषी विभागाकडे ७७ हजार एकरावर द्राक्षाची नोंदणी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर द्राक्ष संघाकडून अंदाजे सव्वा लाख एकरावर द्राक्षाचे क्षेत्र आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थात, सांगली जिल्ह्यात द्राक्ष संघ आणि कृषी विभागाकडील द्राक्षाच्या क्षेत्रात ४८ हजार एकराची तफावत असल्याचे दिसते.
क्षेत्रातील तफावतीमुळे भरपाई मिळण्यास अडथळे
द्राक्ष पीक हे अतिसंवेदनशील आणि खर्चिक आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बागेचे नुकसान झाले, तर शासन पातळीवर नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र द्राक्ष पिकाच्या क्षेत्रात तफावत असल्याने नुकसान भरपाई पुरेशा प्रमाणात मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
सातत्याने सर्व्हर डाउन
ई-पीक पाहणी ॲपवरून द्राक्षाचे क्षेत्र पीक पेऱ्यात नोंद करता येऊ शकते. मात्र सातत्याने ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यासाठी सर्व्हर डाउन होत असल्याने नोंदणी करण्यासाठी अडथळे येत आहेत. नेटवर्क बंद पडत असल्याने द्राक्ष पिकाची नोंदणी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.