Baramati News : पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातील बारामती, पुरंदर व इंदापूर तालुक्यांतील १०८ गावांमध्ये मागील वर्षी अटल भूजल योजना राबवली गेली होती. पहिल्या टप्प्यामध्ये या तिन्ही तालुक्यांतील ३० गावांचा स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला होता.
आता उर्वरित गावांसाठी ही स्पर्धा असणार आहे. इच्छुक ग्रामपंचायतींना २८ फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धेसाठी अर्ज करता येणार आहे. याबाबतचा अध्यादेश नुकताच राज्य शासनाने जाहीर केला आहे.
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा केवळ अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट गावांकरिताच लागू असणार आहे. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा ही सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षाकरिता राबविण्यात आली आहे.
दरवर्षी राज्य व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय, व तृतीय येणाऱ्या पात्र गावांना व अधिकारी, कर्मचारी आणि अटल भूजल योजनेमध्ये नेमलेल्या जिल्हा भागीदार संस्था (डीआयपी) यांना या स्पर्धेच्या अनुषंगाने पुरस्कार अथवा प्रशस्तिपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत.
तसेच भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमधून प्राप्त झालेला निधी संबंधित ग्रामपंचायतींना ग्रामसभेच्या मान्यतेने जल सुरक्षा आराखड्यामध्ये मंजूर असलेल्याच अशा कामावर खर्च करावा लागणार आहे.
यामध्ये जलसंधारण, भूजल पुनर्भरण किंवा पाणी बचतीच्या कोणत्याही कामांवर हा निधी खर्च करता येईल, जल सुरक्षा आराखड्यामध्ये मंजूर नसलेल्या कोणत्याही कामावर पुरस्काराचा निधी खर्च करता येणार नाही, असे या अध्यादेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पुरस्काराचे स्वरूप
जिल्हास्तर व राज्य स्तरावर देण्यात येणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या गावांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
क्रमांक जिल्हा स्तर राज्य स्तर
प्रथम ५० लाख १ कोटी
द्वितीय ३० लाख ५० लाख
तृतीय २० लाख ३० लाख
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.