डॉ. एस. डी. सावंतGrape Farmers Alert: एकापाठोपाठ येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचे प्रक्षोभ अजूनही सुरूच आहेत. राज्यातील सर्वच द्राक्ष विभागांमध्ये सध्या तापमान ४० अंशांपेक्षा जास्त आहे. या पश्चिमी प्रक्षोभाच्या प्रभावाने उत्तरेकडून येणारे वारे आणि उष्ण वातावरणामुळे अरबी समुद्राकडून व बंगालच्या उपसागरातून येणारे वारे मध्य भारतात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येत आहेत. .महाराष्ट्राजवळच्या कर्नाटकाच्या भागात काही दिवसांपासून पाऊस होत आहे. या आठवड्यात महाराष्ट्राच्या सर्व द्राक्ष विभागात वातावरण कमी जास्त प्रमाणात ढगाळ राहू शकेल. त्यातील काही ठिकाणी हे ढग जास्त घन राहून हलक्या पावसाची सरी पडतील. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात (ता. १७ ते २४) अशा प्रकारचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होण्याची शक्यता अनेक हवामान मॉडेल्स दाखवत आहेत. तसे पाहता मोठ्या पावसाची शक्यता कुठेच दिसत नाही. मात्र द्राक्ष विभागातील जिथे हलक्या पावसाची शक्यता दिसत आहे. त्याची थोडक्यात माहिती घेऊ..Grape Farmer Issue: दोन लाखांच्या मर्यादेमुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये नाराजी .शुक्रवार (ता. १७) सोलापूर व बारामतीच्या काही भागात, शनिवार- रविवार (ता. १८-१९) सोलापूर, सांगली, व जवळपासच्या कर्नाटकाच्या सीमेलगतच्या भागात हलका पाऊस दर्शविला आहे. सोमवार ते शुक्रवार (ता. २० ते २४) पर्यंत बहुतांशी सर्वच द्राक्ष विभागात थोड्या जास्त पावसाची शक्यता दिसते. या दिवसात सांगली, विटा, मायानी, बारामती, अहिल्यानगर, आणि नाशिकच्या ओझर व निफाड जवळपासच्या परिसरात पावसाची शक्यता आहे..पाऊस होणाऱ्या विभागामध्ये दिवसाचे तापमान थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे जाणवेल. मात्र, सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे वातावरण दमट होईल. भारतीय हवामान विभागाने नुकताच २०२६ च्या नैॡत्य (साउथ - वेस्ट) मॉन्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. हा अंदाज आणि काही दिवसांपूर्वी स्कायमेटने दिलेला अंदाज बऱ्याच प्रमाणात मिळताजुळता आहे. ‘आयएमडी’ने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिला आहे, पण तो ९२ टक्क्यांपर्यंत कमी दर्शविला आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात विशेषतः द्राक्ष विभागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच दाखविला आहे. ‘एल निनो’च्या प्रभावाने ऑगस्ट व सप्टेंबरच्या महिन्यातील पावसाचे प्रमाण फारच कमी दिसत आहे. .मात्र त्याच वेळी इंडियन डायपोल पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता असल्यामुळे आणि युरोशियाच्या भागामध्ये या वर्षी बर्फ कमी पडलेला असल्यामुळे एल निनोचा प्रभाव कमी होऊ शकेल. त्यामुळे ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यांतही चांगला पाऊस होईल, ही आशा धरायला हरकत नाही..सर्वच द्राक्ष विभागांमध्ये काढणी जवळ जवळ संपत आली आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून बागांमध्ये खरड छाटणी सुरू झालेली आहे. मागील आठवड्यातील कमी सापेक्ष आर्द्रतेमुळे आणि जास्त तापमानामुळे नवीन फुटी फुटण्यास अडचणी येत होत्या. आता या आठवड्यात संभाव्य ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आर्द्रता वाढेल. या वाढलेल्या आर्द्रतेमुळे फुटी चांगल्या निघण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे..नव्या पानांवरील करपा नियंत्रणासाठी...वाढलेली सापेक्ष आर्द्रता व ढगाळ वातावरणातील उबदार राहिलेले वातावरण यामुळे नवीन फुटींवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा करपा बुरशीजन्य असेल की जिवाणूजन्य याबाबत आत्ताच बोलणे योग्य होणार नाही. पण आजवरचा अनुभव पाहता कोवळ्या फुटींवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो आणि नुकसानही करू शकतो. .Crop Protection: थंडीच्या काळात काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन.सोलापूर, पंढरपूर, बार्शी या उष्ण भागात जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. मात्र तोही पाने मोठी झाल्यानंतर विशेषतः हिरवीगार झाल्यानंतर येतो. पावसामुळे जिवाणूंचा प्रसार होतो. पानांवर शिरांच्या मधल्या भागात प्रथम पाणीदार (वॉटर-सोक) बरेच डाग दिसतात. तेकालांतराने गडद तपकिरी होतात. पानावर डाग जास्त प्रमाणात असल्यास पानगळ होते. अशा परिस्थितीत जिवाणूजन्य करपा रोगाचे डाग हिरव्या काडीवरसुद्धा वाढतात. काडीवर वाढलेले डाग काडीवर भेगा पडल्याचे (क्रॅकिंग) दर्शवितात. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार, काडीवर जिवाणूंचा डाग असल्यास त्या काडीवर घड निघत नाही..बुरशीजन्य करपा हा फक्त कोवळ्या फुटींवर प्रादुर्भाव करतो. पानावर दिसणारे बुरशीजन्य करपा रोगाचे डाग वाढत्या कोवळ्या पानावर झालेल्या संसर्गानंतर वाढलेले असतात. एकदा पान जुने झाले की त्यानंतर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. नवीन कोवळ्या फुटींवर जिवाणूजन्य करपासुद्धा उष्ण व जास्त आर्द्रतेच्या वातावरणात वाढू शकतो, हे लक्षात ठेवावे. कोवळ्या फुटींवर वाढलेला बुरशीजन्य व जिवाणूजन्य करपा या दोन्हींची लक्षणे ही जवळपास सारखीच असतात. .त्यामुळे कोवळ्या फुटीवरचा करपा नेमका बुरशीमुळे आला की जिवाणूंमुळे हे सांगणे कठीण होते. पण ठोकताळ्यासाठी ज्या बागेत पूर्वी जिवाणूजन्य करपा दिसला होता, तिथे बुरशीजन्य करपा रोगाबरोबरच जिवाणूजन्य करपासुद्धा असू शकेल, असे गृहीत धरण्यास हरकत नाही. मागील काही वर्षांच्या निरीक्षणावरून करपा रोगाच्या बुरशी आणि जिवाणू एकत्र वाढत असल्याचे निष्कर्ष राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनीही काढलेला आहे. .म्हणूनच एक रणनीती म्हणून सध्याच्या उष्ण व जास्त आर्द्रतेच्या वातावरणामध्ये जिवाणू व बुरशी या दोन्हीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त रसायनांचा फवारणीसाठी वापर केला पाहिजे. सध्या छाटणीनंतर बागेमध्ये नवीन फुटी फुटलेल्या असल्यास कार्बन्डाझिम (५० टक्के) १ ग्रॅम अधिक मॅंकोझेब (८० टक्के) २ ग्रॅम (टॅंक मिक्श्चर) मिश्रण प्रति लिटर या प्रमाणात फवारता येईल. कार्बन्डाझिम व मॅंकोझेब ही दोन्हीही बुरशीनाशके असली तरी त्यातील मॅन्कोझेब हे जिवाणूही कमी करू शकते..ताम्रयुक्त बुरशीनाशकांनी नियंत्रित होत नसलेले काही करपा रोगाचे जिवाणू मॅन्कोझेबने बऱ्यापैकी नियंत्रित होऊ शकतात. त्याच बरोबर मॅंकोझेबमध्ये असलेल्या झिंक आणि मँगेनिज या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा नवीन वाढीला फायदा होतो. कार्बन्डाझिम हे बुरशीनाशक रासायनिकदृष्ट्या सायटोकायनीनसारखे आहे. त्यामुळे नवीन वाढ व पाने हिरवी होतात. काडीत घड बनण्यासाठीही मदत होते.- डॉ. एस. डी. सावंत ९३७१००८६४९ (लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे निवृत्त संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.