
Solapur News: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी, असे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता. ४) पंढरपुरात श्री विठ्ठलाला घातले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शेतकऱ्यांसह एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर पांडुरंगास अभिषेक करून हे साकडे त्यांनी घातले. त्यानंतर मंदिरात जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. या वेळी शेट्टी यांच्यासह विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे,
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रवी मोरे तानाजी बागल, दामू इंगोले, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, किशोर ढगे, शिवाजी पाटील, अजित बोरकर, किरणराज घाडगे, प्रताप गायकवाड, संदीप पाटील आदी उपस्थित होते. शेट्टी, पाटील यांनी या वेळी पांढरा फेटा, हातात टाळ-वीणा घेऊन वारकरी वेशात हे साकडे घातले.
श्री. शेट्टी म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस ६ जुलैला पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत. या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा. तसेच संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय तातडीने घ्यावा.
अन्यथा, या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद तरी आम्हाला दे, असे साकडे आम्ही विठ्ठलाला घातल्याचे शेट्टी म्हणाले. या वेळी आमदार पाटील, खासदार शिंदे यांनीही शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे, कर्जमाफी मिळालीच पाहिजे,’ अशा घोषणा दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.