Jalgaon News : चारा पिकांची कमी पेरणी झालेली असतानाच अतिपावसाने खानदेशात चाऱ्याची स्थिती खराब झाली आहे. अजूनही पाऊस अधूनमधून येत आहे. यामुळे चारा उत्पादन कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
माळरानात हिरवळ आहे. मका, ज्वारी पेरण्या खानदेशात कमी झाल्या होत्या. यात पाऊस आला. अतिपावसात मका, ज्वारीचा कडबा काळवंडला आहे. सोयाबीनचा भुसाही खराब झाला आहे. या कारणांमुळे खानदेशात पुढे चाराटंचाई तयार होण्याचे संकेत आहेत. दुधाळ पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देताना दूध उत्पादकांना मोठा खर्चही करावा लागणार आहे.
हिरवळ असल्याने त्यात पशुधन चराईसाठी जात आहे. पण पुढील एक महिन्यात चाऱ्याची समस्या तयार होईल. खानदेशात सुमारे १६ लाख पशुधन आहे. यात जळगाव जिल्ह्यात साडेआठ लाख पशुधन आहे. खानदेशात दर महिन्याला पावणेतीन लाख टन चाऱ्याची गरज असते. जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, रावेर, यावल, चोपडा, पारोळा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारात नंदुरबार, शहादा हा भाग दूध उत्पादनात अग्रेसर आहे.
यात शेळ्या-मेंढ्यांची आणखी मोठी संख्या आहे. परंतु पशुधनाला पुढे पुरेसा चारा कसा आणावा, असा मुद्दा आहे. सध्या पाऊस सुरूच आहे. ज्वारी, मक्याची पेरणी हवी तेवढी नव्हती. मका पेरणी बऱ्यापैकी झाली. पण त्याचा चारा हाती आलेला नाही. बाजरी पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होता. पण ज्वारीची पेरणी हवी तेवढी होऊ शकली नाही.
खानदेशात खरिपाखाली एकूण १४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात साडेआठ लाख हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित आहे. सुमारे ३० हजार हेक्टरवर सोयाबीन, १५ हजार हेक्टरवर तूर आहे. तृणधान्यवर्गीय पिके म्हणजेच चारा पिकांची तीन लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.
पेरणी तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रात केली जाते. पण पावसाने चाऱ्याची गणिते बिघडवली आहेत. सध्या चाऱ्याची समस्या नाही. केळी पट्ट्यात चारा मुबलक आहे. परंतु कोरडवाहू पिकांच्या क्षेत्रात चाऱ्याची समस्या तयार होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.