Solapur News : पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाच टीएमसी पाणी येणार आहे. त्यामुळे सोलापूर, पंढरपूरसाठी जेवढे पाणी सोडले, तेवढेच पाणी पुन्हा धरणात येणार असल्याचा दिलासा मानला जात आहे.
यंदाचा पावसाळ्याचा शेवट आता अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाही उजनी धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांवर गेलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांना उजनीचा आधार आहे. दुसरीकडे १००हून अधिक ग्रामपंचायतींसह सोलापूर, धाराशिव, कर्जत-जामखेड व सोलापूर जिल्ह्यातील काही नगरपालिका व पुणे, सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींनाही उजनीचाच आधार आहे.
सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. परंतु, पुणे जिल्ह्यात तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरू असल्याने सध्या उजनीत दौंडवरून साडेतीन हजार क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत धरणात पाच टीएमसीपर्यंत पाणी येईल आणि धरण पुन्हा २५ टक्के होईल, असा विश्वास जलसंपदा लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, उजनीतून सोलापूर, पंढरपूरसाठी सोडलेले पाणी आता २९ सप्टेंबरला बंद केले जाणार आहे. त्यानंतर धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे
भीमा खोऱ्यातील (पुणे जिल्ह्यातील) कळीमोडे, चासकमान, वडीवळे, आंद्रा, पवना, वीर, कासारसाई, पानशेत, निरा देवधर, भाटघर व वरसगाव ही धरणे १०० टक्के भरली आहेत. वडज, भामा आसखेड, मुळशी, गुंजवणी ही धरणे देखील ९५ टक्क्यांवर आहेत. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात किंवा उजनी धरण क्षेत्रात पाऊस पडल्यास त्याचा लाभ सोलापूरला सर्वाधिक होईल, अशी सद्य:स्थिती आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.