Cloudy Weather : ढगाळ वातावरणाचा धसका

Khandesh Weather : खानदेशात दीपोत्सवात थंडीची चाहूल लागली. यातच मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे.
Cloudy Weather
Cloudy Weather Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात दीपोत्सवात थंडीची चाहूल लागली. यातच मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. पिकवाढीसही यामुळे फटका बसू शकतो, असाही अंदाज आहे.

दीपोत्सवाच्या पूर्वीदेखील अंशतः ढगाळ वातावरण होते. परंतु हे वातावरण निवळले आणि थंडीचे आगमन झाले. किमान तापमान खानदेशात १० अंश सेल्सीअसपर्यंत आले होते. परंतु दीपोत्सव संपताच अंशतः ढगाळ वातावरण पुन्हा तयार झाले आहे. यामुळे केळी, भाजीपाला पिकांत बुरशीजन्य रोगांची समस्या पसरण्याची भिती आहे. तसेच हरभरा, दादर ज्वारी आदी पिकांच्या वाढीसही फटका बसू शकतो.

Cloudy Weather
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची शक्यता; तापमानात झाली वाढ!

सध्या निरभ्रर, कोरड्या वातावरणाची गरज रब्बी पिकांना आहे. परंतु पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसानीचा धसका घेतल्याची स्थिती आहे. कारण सध्या कांदेबाग केळी, पपई पिकात काढणी सुरू आहे.

केळी लागवडदेखील खानदेशात सुरू आहे. काढणी, खरेदीची कार्यवाही शिवारात होत असल्याने त्यासाठी कोरड्या व निरभ्र वातावरणाची गरज आहे. ढगाळ वातावरणामुळे खरेदीदार खरेदी, काढणीची प्रक्रिया लांबणीवर टाकतात. यामुळे शेतकऱ्यांना काढणीची प्रतीक्षा करावी लागते.

कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीची उगवण खानदेशात बऱ्यापैकी झाली आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी सिंचनाचे नियोजन केले होते. परंतु अशातच पाऊस आल्यास मोठी हानी होईल, अशी भिती असल्याने सिंचनाचे नियोजन शेतकऱ्यांनी लांबणीवर टाकले आहे.

मागील दोन दिवसांपासून दुपारी उकाडा, उष्णता व रात्री १० नंतर काहीसे थंड वातावरण तयार होत आहे. पहाटेची थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, हे तापमान १३ अंश सेल्सीअसवरपर्यंत पोचले आहे.

Cloudy Weather
Weather Update : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

नोव्हेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडीचा, शेतात भरीत पार्ट्यांचा मानला जातो. थंडी याच काळात वाढत जाते. परंतु हुडहुडी भरविणारी थंडी पडण्यापूर्वीच तापमानात काहीशी वाढ झाली आहे. विविध हवामान अभ्यासकांनी थंडीवर परिणाम होईल, असे भाकीत केले आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी केळीचे सिंचन वाढविण्याचा विचार केला आहे. कारण उष्णता वाढली आहे. थंडीच्या काळात केळी पिकाचे सिंचन रात्री केले जाते. परंतु या नियोजनात अनेक केळी उत्पादकांनी बदल केला आहे. तसेच लहान केळी पिकात बुरशीजन्य रोगांची समस्या दूर करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत.

खराब रस्त्यांलगतच्या शेतकऱ्यांचा काढणीवर भर

खराब रस्ते, अडचणीच्या भागातील रस्त्यांलगतच्या शेतकऱ्यांनी मात्र केळी, पपई काढणीवर भर दिला आहे. कारण या भागात हलका पाऊसदेखील झाल्यास वाहने शेतापर्यंत पोचत नाहीत. यामुळे काही शेतकऱ्यांना कमी पक्व शेतमालही काढणी करून खरेदीदारांना द्यावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com