
Amravati News : शेतकरीस्तरावरच पीकपेऱ्याची नोंद व्हावी याकरिता शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने अमरावती जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ २३ टक्केच शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीकपेरा नोंदविला आहे. तब्बल ४.७० लाख शेतकरी अशा नोंदीपासून दूर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने यंदाच्या खरिपात पेरण्या लांबल्या. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या सुरू होत्या. शासनाने देखील १ जुलैपासून ई-पीक पाहणीची अंमलबजावणी केली. मात्र पावसालाच पाच जुलैपासून सुरुवात झाल्याने ऑनलाइन पीकपेरा नोंदणीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाली. त्यातच मोबाइल नेटवर्क, ॲपमधील तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन पेरा नोंदणीला प्रतिसादच दिला नाही.
परिणामी जिल्ह्यातील ५.१३ लाख शेतकरी खातेदारांपैकी आजवर केवळ १.१६ लाख शेतकऱ्यांनीच ऑनलाइन नोंदणी केल्याचे वास्तव समोर आले आहे. हे प्रमाण केवळ २३ टक्के असून तब्बल ४.७० लाखांवर शेतकरी ऑनलाइन पीकपेऱ्यापासून दूर असल्याचे चित्र आहे.
१६९७ खातेदारांची तलाठ्यांद्वारे ऑनलाइन पीक नोंद करण्यात आली. या दोन्हीच्या माध्यमातून १.८० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ॲपद्वारे नोंद घेण्यात यश आले आहे. सुरुवातीला अशा प्रकारच्या नोंदीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत होती. आता त्यात वाढ करून १५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.