Wardha News : सोयाबीन पीक पिवळे पडून करपले. त्या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादकांना सरसकट ५० हजार रुपयांच्या भरपाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पक्ष पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात भेट घेऊन नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पाठपुरावा करण्यासाठी साकडे घातले.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. पण यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने खंड दिला. परिणामी पेरण्यांना विलंब झाला. त्यानंतरच्या काळात येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादकता प्रभावीत झाली.
आता मूळकुज व इतर रोगांमुळे सोयाबीन करपले. हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास या कारणामुळे हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे नुकसान पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने सरसकट भरपाईची मागणी केली आहे.
सरासरी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. या विषयावर पक्षाकडून आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर वर्धा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही सोयाबीनची करपलेली झाडे दाखवत नुकसानीची जाणीव करून देण्यात आली. इतक्यावरच न थांबता या नेत्यांनी थेट शरद पवार यांची भेट घेत त्यांनाही सोयाबीनचे सुकलेले झाड दाखवून नुकसानीचे वास्तव त्यांच्या लक्षात आणून दिले.
शेतकऱ्यांची या आर्थिक संकटातून सुटका करण्याकरिता हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत पंचनामे न करता मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यासाठी आपल्यास्तरावर पाठपुरावा करावा, असेही साकडे श्री. पवार यांना घालण्यात आले. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, सहकार नेते सुधीर कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, विठ्ठल गुळघाणे, आफताब खान उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.