
Parbhani News : यंदा खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना ५० टक्के अग्रिम पीकविमा परतावा मिळावा यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन) लागू करण्यासाठी विमा कंपनीस आदेश पारित करण्यात यावेत या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणा देत आंदोलन केले.
परभणी जिल्ह्यात यंदा पेरण्या उशिरा झाल्या. जुलै, ऑगस्ट महिन्यांत २१ दिवसांपासून पावसाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये उघडिप दिल्याने संपूर्ण सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिकांची वाढ खुंटलेली आहे. तसेच ऐन फुलांच्या अवस्थेमध्ये पाण्यावाचून पिके सुकून जाऊन माना टाकत आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान विभागाने पावसाचा खंडकाळ वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे.
पावसातील खंडाची परिस्थिती पाहता पंतप्रधान पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या विमा संरक्षण या तरतुदीची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान पीकविमा योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गणेश घाटगे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई किर्तीकुमार बुरांडे, शिवाजीराव बेले, तुकाराम गिराम, सुधाकर शिंदे, राजेभाऊ कच्छवे, मुंजाभाऊ शिंदे, मधुकर लाड आदींनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.