
Solapur News : जून महिना संपत आला तरी अद्यापही पेरणी योग्य पाऊस पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे आता खरिपाची पेरणी लांबणीवर पडणार आहे.
मॉन्सूनचे आगमनच उशिराने झाल्याने पावसाला सुरवात उशिरा झाली. मात्र राज्यात मॉन्सून सक्रिय होऊनही आठ दिवस झाले तरी अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याने जिल्ह्यात अद्याप कुठेही खरिपाची पेरणी झालेली नाही.
यंदा मृग नक्षत्राचे आगमन आठ जून रोजी झाले. मृग निघाली तरी पाऊस न आल्याने पेरणी लांबणीवर गेली आहे. आठवड्यापूर्वी मॉन्सूनचे आगमन झाल्याने पावसाला सुरवात झाल्याने खरीपाच्या पेरणीची आशा शेतकऱ्यांना लागल्या आहेत.
अनेकवेळा रोहिणी नक्षत्रात पडलेल्या पावसावर खरिपाची पेरणी झाल्यास आषाढी वारीपर्यंत तूर, मूग, सोयाबिन ही पिके वाढीस लागतात. यंदा मात्र आषाढी वारी सुरू होऊनही खरिपाची पेरणी झालेली नाही. यामुळे याचे सावट वारीवर देखील आहे.
मागील आठ दिवसांत केवळ एकाच दिवशी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर मात्र केवळ एक दोन मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे.
पावसाच्या आगमनाने तापमान कमी होऊन चारापिके, भाजीपाला पिकांना जीवदान मिळाले असले तरी पुढील पिकांच्या पेरणीसाठी अजूनही पुरेशा पावसाची आवश्यकता आहे. यामुळे अद्यापही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेतच बळिराजा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.