
Nashik News : नाशिक जिल्हा सहकारी बँक व कांदा व इतर शेती मालाच्या भावाच्या प्रश्नामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावलेले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने एकत्र येत ‘शेतकरी पतप्रतिष्ठा संरक्षण पंचायत’ भरविली आहे.
सरकारी हस्तक्षेप, जिल्हा बँकेची मनमानी यामुळे शेतकरी संकटात आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने पहावे. अन्यथा सरकारने या पंचायतीची दखल न घेतल्यास मोठ्या जनआंदोलनाची तयारी करण्याचा इशारा, शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेने दिला.
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करून गुरुवारपासून (ता. १५) जनशांती धाम, ओझर मिग (ता. निफाड) येथे बेमुदत ‘शेतकरी पतप्रतिष्ठा संरक्षण पंचायत’ भरविण्यात आली.
या वेळी शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे, माजी प्रांतिक अध्यक्ष स्वतंत्र रामचंद्र बापू पाटील, भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, महिला आघाडीच्या नेत्या सीमा नरोडे, शशीकांत भदाने, खेमराज कोर, शेतकरी महिला आघाडी अध्यक्ष निर्मला जगझाप, माजी अध्यक्षा स्मीता गुरव, जिल्हा कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले, शैलेंद्र कापडणीस, रावसाहेब औताडे आदी उपस्थित होते.
राज्यभरातून विविध जिल्ह्यांतून शेतकरी या परिषदेला उपस्थित होते. या वेळी सहायक निबंधक (सहकार) यांच्या आदेशाला स्थगिती व आदेशाधीन राहून महसूल विभागाने सात-बारावर कर्जवसुली संदर्भात घेतलेले फेरफार रद्द करणे.
शेतकऱ्याने भरलेल्या कर्जावरील बेहिशेबी व्याज परत मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्यासह शेतीमाल काढणे यांसह विविध विषयांवर मंथन करण्यात आले.
चर्चेतील प्रमुख विषय :
- नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली, जप्ती आणि लिलावास स्थगिती व कर्जमुक्ती
- सात-बारावरील कर्जवसुली संदर्भातील केलेले फेरफार रद्द करण्यात यावे.
- शेतीच्या किमतीच्या प्रमाणात कर्ज
- शेतकऱ्यांनी भरलेल्या कर्जावरील आकारलेले बेहिशेबी व्याज परत मिळावे.
- कांदा नुकसानभरपाई सर्व हंगामी कांद्याला मिळावी.
- नाशिक जिल्हा बँक कर्जप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याच पर्याय अवलंबणे.
पाच लाखांच्या कर्जासाठी दोन कोटींच्या जमिनीची जप्ती
कोठरे (ता. मालेगाव) येथील शेतकरी रमेश पवार यांनी पाच लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाच्या वसुली पोटी नऊ एकर जमीन (किंमत दोन कोटी) नावावर करण्याचा घाट घातला आहे.
त्यामुळे भोगवटदार सदरी त्यांचे नाव संपुष्टात येऊन गावातील सोसायटीचे नाव लागणार आहे, अशी कैफियत पवार यांनी मांडली. असे प्रकार अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडल्याने जिल्हा बँक व विविध कार्यकारी सोसायटी यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.