Water Conservation : राजस्थानातील आलमपूरमध्ये कौटुंबिक संपन्नता

Water Management : गावात पाण्याचे संकट असताना तरुणांचं स्थलांतर झपाट्याने होत होते, त्या वेळी तरुण भारत संघानं लोकसहभागातून जलसंधारणाचं काम सुरू केलं.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

डॉ. राजेंद्रसिंह

Aalampur Water Conservation : राजस्थानमधील आलमपूर हे गाव डोंगराच्या मधोमध वसलेलं असून हे गाव मासलपूर तहसीलपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. इथं ५० कुटुंबे राहतात, इथं एक अतिशय जुना तिमनगड किल्लाही आहे, त्यामुळे हजारो वर्षांपूर्वी वस्ती असलेले गाव मानले जाते.

सध्या हा किल्ला जीर्ण अवस्थेत आहे. आलमपूर गाव त्याच्या पायथ्याशी वसलंय. बैना नाला आलमपूरच्या काठी उगम पावतो, जो काकड नदीला पुनरुज्जीवित करण्याचं काम करतो. हा नाला पाच वर्षांपूर्वी कोरडा होता, मात्र आता वाहत आहे.

गावात पाण्याचे संकट असताना तरुणांचं स्थलांतर झपाट्याने होत होते, त्या वेळी तरुण भारत संघानं लोकसहभागातून जलसंधारणाचं काम सुरू केलं. गावातील जगदीश सिंह सांगतात, की पूर्वी येथील नाला कोरडा पडला होता, तेव्हा गावाभोवती पाण्याचं मोठं संकट निर्माण झालं होतं,

तेव्हा सर्वप्रथम मी तरुण भारत संघाच्या मदतीनं बारिनाकी तलाव बांधून घेतला होता. तलाव बांधल्यानंतर पहिल्याच पावसानं हा तलाव पूर्णपणे भरला. मी एक लाख रुपयांमध्ये ‘वॉटर चेस्टनट'ची लागवड केली होती आणि पाच बिघा जमिनीत गहू पिकवला होता,

Water Conservation
Water Conservation : जलसंवर्धनात महिलांची घेतली जातेय मदत

ज्यामध्ये ६० क्विंटल गहू पिकला होता. २०१९ मध्ये गावात पाण्याचे मोठे संकट असताना माझ्या तलावातील पाणी नाल्यात सोडण्याचं काम मी केलं. त्यामुळं सुकत चाललेल्या गावातील पन्नास बिघा पिकांना पाणी देण्यासाठी लोकांना मदत झाली. मी पाण्यासाठी एक रुपया देखील घेतला नाही आणि लोकांनी सहाशे क्विंटल गहू काढला.

गावातील सुगरे यांनी सांगितलं, की मी तरुण भारत संघालाही पांचवाली तलाव बांधण्यासाठी विनंती केली होती. तो तलाव तयार केल्यानंतर आज मी ‘वॉटर चेस्टनट’ची लागवड करतो. त्यातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत असून बेना नाल्याचं पुनरुज्जीवन केलं जात आहे.

या तलावांच्या बांधकामामुळे गावातील पाण्याची पातळीही वाढली आहे. माझ्याकडे दोन शेळ्या आणि वीस म्हशी आहेत. माझी जनावरं या तलावाचं पाणी पितात. त्यांच्यासाठी चाराही आहे. आता आयुष्य आनंदानं जात आहे.

रतन सिंह म्हणाले, की आम्ही आठ भाऊ आहोत. तरुण भारत संघाच्या मदतीनं दोन तलाव बांधण्याचं काम आठ भावांनी केलं आहे. पीरचा डेरा आणि गोंडचा हे ते तलाव आहेत. आता या दोन्ही तलावांत मुबलक पाणी आहे.

आमचे प्राणी त्यात पाणी पितात आणि त्यात अंघोळ करतात. गावात सर्वत्र पाणीच पाणी आहे. रामवीर सिंगने सांगितले, की जेव्हा माझ्याकडे पाणी नव्हतं, तेव्हा मला खूप त्रास सहन करावा लागला होता. या संकटाचा सामना करण्यासाठी तरुण भारत संघाच्या मदतीनं जलसंधारणाचं काम केलं.

त्यामध्ये आमचे सहा भागीदार आहेत. पूर्वी नापीक असलेली आमची २५ बिघा जमीन आता लागवडीखाली आहे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे. आता आमच्याकडे भरपूर खायला धान्य आहे.

याने बैना नाला कायमचा पुनरुज्जीवित झाला आहे. या नाल्यातून काकड नदीचंही पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. त्याच्या मदतीने स्थायिक झालेल्या अनेक गावांतील लोकांना आता पाणी मिळू लागले आहे. लोकांचे राहणीमान सुधारले असून आरोग्य आणि शिक्षण दोन्ही बळकट झाले आहेत.

आता आमचं आयुष्य आनंदानं जात आहे. आता आमच्या गावातील लोकांनी नवीन घरे बांधून वाहनं खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. आता आमच्यावर वेगळंच संकट उभे ठाकले आहे. जेव्हा आमच्या गावात पाणी नव्हते, जंगल नव्हते, शेती नव्हती आणि प्राणी नव्हते. ते एकाकी जीवन होतं, त्या वेळी सरकारांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही.

जेव्हा पाणी आले आणि आम्ही जंगल वाचवण्याचं काम केलं, शेती सुरू झाली, पशुसंवर्धन वाढलं, मुले शिकू लागली आणि प्राणी जंगलात आले, तेव्हा सरकारनं आमच्याशी दुटप्पी वागण्यास सुरुवात केली. आमच्या शहर परिसराला बंधवा डाटा संरक्षित क्षेत्र घोषित करत उजाड करण्याचं काम केलं जात आहे. त्या वेळी सरकारनं जंगलं का वाचवली नाहीत, जनावरं का वाचवली नाहीत आणि सरकारनं अवैध उत्खनन का केलं ?

सरकारनं बेकायदेशीर लाकूड व्यापाराची सोय केली होती, त्यामुळे बंद बरेठा वन्यजीव अभयारण्य घोषित करणे हे आमच्या जीवितास मोठा धोका आहे, असं ग्रामस्थांचे म्हणणं आहे. संपतीदेवी म्हणाल्या, की गावात पाणी नसताना महिलांच्या जिवाला मोठा धोका होता. या गावात मुली द्यायला कोणी येत नसे, कारण पाणी दुरून आणावं लागत असे.

आजूबाजूला डोंगर होते, आलमपूर सोडून दुसरे गाव दिसत नव्हतं. इथं खूप कमी लोक ये-जा करत होते आणि महिलांची अंघोळीची व्यवस्था फार कमी होती. येथे मी प्रथम बारीनचे तळे बनवण्याचं काम केलं. त्यात मी ज्यांना साधन आहे, त्यांना जेवण द्यायचं. तळ्याच्या काठावर उभं राहून टोकन देण्याचं कामही केलं आहे.

Water Conservation
Water Conservation Scheme : महाराष्ट्राची जलसंवर्धन योजनांमध्ये आघाडी

सकाळ-संध्याकाळ तिथं पाणी घेऊन जायची आणि त्यांना पिण्यासाठी पाणी द्यायची. कष्टानं मी तळं बनवण्याचं काम केलंय आणि वनविभागानं माझं तळं तयार होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मग मी उभी राहिले आणि स्वत:साठी तळे बनवू लागले आणि म्हणाले, की तुम्ही लोक जंगलतोड करत आहात, डोंगरातून अवैध उत्खनन करत आहात आणि मी पाण्याचं काम करत आहे, ज्यामुळं तुमची जंगले, तुमचे पर्वत आणि तुमचे प्राणी वाचतील.

मग मोठ्या कष्टाने तळं तयार करण्याचं काम होऊ दिलं. तळं तयार झाल्यानंतर मी चांगली शेती करू लागले. मी ‘वॉटर चेस्टनट'ची शेती करते, २० म्हशी असून दूध विकते. आता माझं आयुष्य चांगलं चाललं आहे. गावात सगळीकडं गजबजाट आहे, आता लोकांची ये-जा सुरू आहे आणि लहान मुलांची लग्नंही खूप छान होत आहेत. आता जीवन शांततेत आणि आनंदानं चालू आहे.

खुण्डावासीयांकडून पाण्याची बचत

खुण्डा गाव मासलपूरपासून १२ किमी अंतरावर आहे. त्‍याच्‍या सहा वाड्या आहेत. फदालेपुरा, संडनपुरा, बल्लापुरा, खुटियनपुरा, विराणेपुरा, रामपुरा या वाड्यांच्या परिसरात ज्यात १८० कुटुंबे राहतात. या गावातून तिन्ही बाजूंनी शेरणी नदी वाहते. २०१६ पूर्वी दिवाळीनंतर शेरणी नदी कोरडी पडायची आणि गावातील एकमेव रोजगार खाणकाम होता. पूर्वी पशुपालन, मजुरी, पावसावर आधारित शेती असायची, पण आज ती वर्षभर वाहणारी नदी झाली आहे.

फदालेपुरा येथे पाच कुटुंबे राहतात. इथल्या असरफी म्हणतात, की माझ्या नवऱ्याला दोन भाऊ होते, दोघेही शेती नसल्यामुळे लुटायचे. दरोडा टाकताना दोघांचा मृत्यू झाला. मला लहान मुले होती आणि माझ्या पतीच्या भावाला मोठी मुले होती, ती देखील हिंसक कारवायांमध्ये सामील होती. माझ्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचं मोठं संकट होतं, मी पशुपालनातून माझा संसार चालवत असे.

सात महिने गावात राहायची आणि पाच महिने जनावरांसह माझ्या माहेरच्या घरी जात असे. मी मुलांना सोबत घेऊन जायचे आणि आषाढ महिन्यात पाऊस पडला की परत यायचे. तरुण भारत संघाच्या मरदई मोड येथील आयोजित शेतकरी परिषदेत मी प्रथमच सहभागी झाले. तरुण भारत संघाच्या कार्यानं प्रेरित होऊन नहारच्या नाल्यात तळं करण्यासाठी अर्ज देण्यात आला.

माझा अर्ज स्वीकारून तरुण भारत संघानं पावसापूर्वी माझं तळं केलं होतं. तळ्यात पाणी आल्यावर मी माझ्या दहा बिघा जमिनीवर शेती करू लागले. चार बिघांमध्ये गहू घेतला आणि त्याचे पन्नास क्विंटल, तर सहा बिघांमधील मोहरीचं तीस क्विंटल उत्पादन मिळालं.

भुरा सिंहनं सांगितलं, की पूर्वी मी चुकीच्या कामात गुंतत असे, पण आता पाण्याची उपलब्धता असल्यानं मी शेती करत आहे. संडनपुरा येथील रहिवासी सरदार यांनी सांगितलं, की तो पूर्वी दरोडे घालत असे. आता तरुण भारत संघाच्या मदतीनं पीपल वारा तलाव बांधला आहे, ज्यामध्ये आम्ही पाच भाऊ असून प्रत्येकाला दोनशे - दोनशे मण धान्य मिळते आणि तलावात बारा महिने पाणी असते. अशा प्रकारे, आता संपूर्ण गाव नदीने पाणीदार झाले आहे आणि प्रत्येक जण पाण्याची बचत करतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com