
Akola News : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा तसेच वाशीम या जिल्ह्यांमध्ये मार्च पाठोपाठ एप्रिल महिन्यात पाऊस, गारपिटीने मोठे नुकसान (Crop Damage) झाले.
एवढे सारे नुकसान होऊनही त्या-त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री मात्र अद्यापही बांधापर्यंत पोहोचले नसल्याने आता विरोधक टीका करू लागले आहेत. शेतकऱ्यांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.
मार्च महिन्यात तीन वेळा अवकाळी पावसाने या भागात अनेक ठिकाणी धुळधाण उडवली. त्यानंतर आता एप्रिल महिन्यातही तीन दिवस जोरदार पाऊस झाला. गारपीट झाल्याने नुकसान झाले. अशा संकटाच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री भेटीसाठी येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती.
परंतु अद्याप मात्र पालकमंत्री आलेले नाहीत. यामुळे विरोधकांना आयतीच टीकेची संधी मिळाली. नेत्यांना अयोध्येला जाण्यासाठी वेळ आहे. परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जायला नाही, अशा प्रकारची खरमरीत टीका होऊ लागली.
अकोला जिल्ह्यात मार्च तसेच आता एप्रिल महिन्यात १० हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. गेल्या आठवड्यात पारस (तालुका बाळापूर) येथे झाड कोसळून सात जणांचा मृत्यू सुद्धा झाला होता. अशा मोठ्या आपत्तीच्या काळातही जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्यात आले नव्हते.
विशेष म्हणजे याच काळात ते अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने विरोधक आता टीका करीत आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी जिल्हा दौरा करीत पालकमंत्र्यांवर टीका केली.
सावंत यांनी अकोला जिल्ह्यात पीक नुकसानीच्या पाहणीसह पारस घटनेतील मृतांचे नातेवाईक तसेच जखमींची भेट घेतली. तिकडे बुलडाणा जिल्ह्यातही अवकाळी पावसाने नुकसान केल्याने पालकमंत्र्यांनी भेट देणे गरजेचे होते.
परंतु पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्ह्यात आलेले नाहीत. याबद्दल जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी बुलडाण्यात पत्रकारांसोबत बोलताना पाटील यांच्या टीका करीत त्यांना अयोध्येला जायला वेळ मिळाला पण इकडे यायला मिळाला नाही, असा चिमटा काढला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.