Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Water Conservation : मूलस्थानी जल संधारणावर द्या भर...

Inter Crop Method : आंतरपीक पद्धतीमुळे वेळेवर पेरणी व उशिरा पेरणी अशा दोन्ही परिस्थितींत शाश्‍वत उत्पादन व अधिक आर्थिक उत्पन्नाबरोबरच मृद्‍ व जल संवर्धन होण्यास मदत होते.
Published on

डॉ. आनंद गोरे, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. पपिता गौरखेडे

Sowing Update : आंतरपीक पद्धतीमुळे वेळेवर पेरणी व उशिरा पेरणी अशा दोन्ही परिस्थितींत शाश्‍वत उत्पादन व अधिक आर्थिक उत्पन्नाबरोबरच मृद्‍ व जल संवर्धन होण्यास मदत होते. उशिरा पावसात एक पीक हाताचे गेले किंवा एका पिकास बाजारभाव कमी मिळाल्यास दुसरे पीक ही जोखीम कमी करते.

पावसाचा कालावधी लक्षात घेऊन पीक नियोजन करताना कापूस + मूग/ उडीद /सोयाबीन (१:१), ज्वारी अधिक तूर (४:२), सोयाबीन अधिक तूर (४:२), बाजरी अधिक तूर (३:३) या आंतरपीक पद्धतीवर भर द्यावा.

जलसंधारण सरी

- मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उताराला आडवी खोल सरी काढल्यास जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते.

- बैलाच्या सरीच्या नांगराने अथवा कोळप्याने उतारानुसार ५ ते १० मीटर अंतरावर ४५ ते ६० सेंमी आणि ३० सेंमी खोल सरी काढावी. सरीला ०.२ ते ०.४ टक्का उतार दिल्यास अतिरिक्त पाणी शेताबाहेर जाते.

जलसंवर्धन चर

- काळ्या खोल व भारी जमिनीमध्ये समपातळी किंवा ढाळीच्या बांधास काटछेदाचे चर घेऊन त्यातील माती काठावर टाकून बांध तयार करावा.

- चर सलग न ठेवता, ठराविक अंतरावर खोदलेला भाग राखण्यात येतो. या चरामध्ये साठवलेले पाणी गरजेच्या काळात संरक्षित सिंचनाकरीता उपयोगात येते.

Indian Agriculture
Kharif Sowing : धूळ पेरण्या टाळाव्यात, कृषी आयुक्तांचा सल्ला; मॉन्सून रेंगाळल्यामुळे नियंत्रण कक्ष स्थापन

सरी वरंबा आणि बंदीस्त सरीचा उपयोग

हलक्या, मध्यम उताराच्या जमिनीवर ही पद्धत उपयुक्त ठरते. बळीराम किंवा सरीचा नांगर किंवा कोळप्याच्या साह्याने पेरणीपूर्वी पिकानुसार ५० ते ६० सेंमी अंतरावर सरी वरंबा तयार करून वरंब्यावर लागवड करता येते.

कोरडवाहू शेतीमध्ये आंतर मशागतीची सुरुवातीची कामे झाल्यानंतर सरी वरंबे तयार करून उताराच्या जमिनीमध्ये सरीच्या लांबीवर ५ ते ७ मीटर अंतरावर सऱ्यांमध्ये आडवे वरंबे तयार केल्यास सरीमध्ये जमा झालेले पाणी उताराच्या दिशेने न वाहता जमिनीत तेथेच मुरण्यास मदत होते.

रुंद वरंबा सरी पद्धत

ही पद्धत भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. जास्त अंतरावरील पिकाच्या एक ते दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर घेता येतात. उदा. सोयाबीन पिकाच्या ३ ते ४ ओळी घेता येतात.

केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने विकसित केलेल्या बीबीएफ यंत्राचा किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बीबीएफ यंत्राचा पेरणीसाठी उपयोग करावा. याद्वारे वरंबे तयार करणे, पेरणी करणे, खते देणे अशी कामे एकाच वेळी करता येतात. याद्वारे बियाणे, खतामध्ये बचत होते, उत्पादनात वाढ होते.

बंदिस्त वाफे / बंदिस्त बांध

अल्प उतार तसेच छोट्या आकाराच्या क्षेत्रात परीघावर बांध टाकून मूलस्थानी जलसंधारण करता येते. यासाठी १ मीटर उंचीपर्यंतचा बांध आणि आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याकरिता सांडव्याची व्यवस्था करावी. 

शेततळे आणि पाण्याचा पुनर्वापर

बऱ्याच वेळा मृद्‍ व जलसंधारणाच्या विविध उपायांचा अवलंब करूनही जमिनीत न मुरलेले पावसाचे अतिरिक्त पाणी पृष्ठभागावरून वाहून जाते. हे पाणी शेताच्या खोलगट भागात शेततळ्याद्वारे साठवून संरक्षित सिंचनाकरिता उपयोगात आणता येते.

तुरीमध्ये १ ते २ संरक्षित सिंचनामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होते.

Indian Agriculture
Sowing Update : पेरणी योग्य पावसाची वाट बघाच

आच्छादनाचा वापर

सुरुवातीस पावसाच्या आगमनानंतर एक ते दोन खंड जुलै, ऑगस्ट महिन्यात दिसतात. अशावेळी जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांना पाण्याचा ताण बसतो.

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. (उदा. सुबाभूळ, गिरिपुष्पाचा पाला, गव्हाचा भुसा, मातीची भर इत्यादी)

आधुनिक सिंचन पद्धती उदा. पिकानुसार ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा अवलंब करावा.

फवारणीद्वारे अत्रद्रव्यांचा वापर

पाण्याचा ताण सहन करण्याच्या दृष्टीने पोटॅशिअम नायट्रेटची (१३:००:४५) साधारणपणे १ ते १.५ टक्का (१०० ते १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी.

उभ्या पिकांत ठरावीक अंतरानंतर सरी

खरीप पिकांच्या पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आंतरमशागतीची सुरुवातीस कामे पूर्ण झाल्यानंतर बळीराम किंवा लाकडी नांगराने पिकांच्या ओळीमध्ये (ठरावीक अंतरावर किंवा ठरावीक ओळीनंतर) उदा. कापूस, तूर या सारख्या जास्त अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक एक ते दोन ओळींनंतर आणि तूर, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीनसारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक ४ ते ६ ओळींनंतर सऱ्या काढाव्यात.

१५ ते २० सेंमी खोलीच्या अरुंद सऱ्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संधारण होण्यास तसेच अतिरिक्त झालेल्या पाण्याचा निचरा होण्यासही मदत होते.

संपर्क - डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२, (अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com