Mango Farming : थेट आंबा विक्रीवर भर

Article by Rajesh Kalmbate : रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथील सावंत कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील बागायतदार म्हणून मल्हार यांनी चौदा वर्षांपूर्वी व्यवसायाची धुरा हाती घेतली.
Mango Farming
Mango Farming Agrowon

Farmer Management :

शेतकरी नियोजन

पीक : हापूस आंबा

शेतकरी : मल्हार प्रमोद सावंत

गाव : नाचणे, ता.जि. रत्नागिरी

हापूस क्षेत्र : २५ एकर

एकूण कलमे : ४५०

रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथील सावंत कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील बागायतदार म्हणून मल्हार यांनी चौदा वर्षांपूर्वी व्यवसायाची धुरा हाती घेतली. रत्नागिरी तालुक्यातील जांभरूण आणि नाचणे येथे त्यांच्या हापूस आंब्याच्या बागा आहेत.

या बागांमधील हापूस लागवड जुन्या पद्धतीने म्हणजेच १० बाय १० मीटरवर एक कलम याप्रमाणे करण्यात आलेली आहे. अशी सुमारे साडेचारशे हापूस कलमे आहेत.

सुरुवातीला मल्हार सावंत यांनी मध्यस्थांच्या माध्यमातून आंबा विक्रीवर भर दिला. मात्र सध्या ते नैसर्गिकरीत्या आंबा पिकवून बाजारात विक्रीसाठी स्वतः पाठवितात.

त्यामुळे शेतकरी ते थेट ग्राहक या माध्यमातून आंबा विक्री करण्यामुळे अनेक ग्राहक त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. आंब्याचा दर्जा राखण्यासाठी वर्षभर बागेतील कामांचे योग्य नियोजन करण्यावर विशेष भर देत आहेत.

Mango Farming
Mango Farming : आंबा बागेतील फळगळीची कारणे अन् नियंत्रण उपाय

नियोजनातील बाबी

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पहिला पाऊस झाला. त्यानंतर कलमांना सेंद्रिय खतांच्या मात्रा देण्यात आल्या. त्यात गांडूळ खत दोन घमेली प्रति कलम याप्रमाणे मात्रा दिली. खतांच्या मात्रा कलमाचा आकार आणि वयानुसार ठरविली जाते.

खतमात्रा देण्यासाठी मजुरांची उपलब्धता पाहावी लागते. कारण याच काळात भातशेतीला देखील प्रारंभ होतो. त्यामुळे मजुरांची उपलब्ध ही मोठी बाब ठरते.

सेंद्रिय खतांच्या मात्रा दिल्यानंतर पुढील पंधरा दिवसांनी म्हणजेच जुलैच्या सुरुवातीला १६ः१६ः१६ हे मिश्र खत दिले जाते. सेंद्रिय खतांबरोबरच रासायनिक खतांची जोड दिल्यामुळे कलमांच्या वाढीस चांगला फायदा होतो.

श्रावण सुरू झाल्यानंतर म्हणजेच ऑगस्टच्या अखेरीस टाळमाती केली जाते. सेंद्रिय किंवा टाळमाती असे नियोजन करावे लागते.

पावसाळ्याच्या दिवसांत बागेत गवत, पालापाचोळा जास्त प्रमाणात तयार होतो. गवत काढून पालापाचोळा गोळा करून तो कलमांच्या बुंध्यात कुजण्यासाठी टाकला जातो. त्याचा कलमांना फायदा होतो.

यंदा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पालवी आली होती. या काळात पालवीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या.

नवरात्रीनंतर बागेतील वाढलेले गवत ग्रासकटरच्या साह्याने कापून घेतले. त्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. बागेत स्वच्छता राखण्यावर विशेष भर दिला जातो.

Mango Farming
Mango Farming : दर्जेदार केसर आंबा उत्पादनात हातखंडा

या वर्षी बागेमध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसून आला होता. कलमांवरील लहान फळांवर थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास उत्पादन आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी वेळेवर रासायनिक नियंत्रण करून प्रादुर्भाव टाळणे आवश्यक ठरते.

फळांचे संरक्षण करण्यासाठी साधारण डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत चार वेळा रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या आहेत. रासायनिक फवारणीमुळे काही अंशी नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

फेब्रुवारी महिन्यात कलमांवर चांगली सेटिंग दिसून होती. त्यासाठी संजीवकांच्या फवारणीवर भर दिला. त्यामुळे कैऱ्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात पुनर्मोहोर आलेला दिसून आला. त्याचा पहिल्या टप्प्यातील आंब्याला फटका बसू नये यासाठी आधीच हलवणी करून घेतली. २०१८ या वर्षी याच पद्धतीने रिफ्लॉवरिंग झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गळ झाली होती.

हाच मागील अनुभव लक्षात घेऊन यंदा नियोजन करत पहिल्या टप्प्यातील उत्पादन घेतले. तसेच नवीन मोहरातून मिळणारे मे अखेरीस उत्पादनाचीही तयारी केली, असे मल्हार यांनी सांगितले.

बागेतील काही कलमे उशिराने मोहरलेली आहेत. आंबा काढणी आटोपल्यानंतर मोहर आलेल्या झाडांची हलवणी केली जात आहे. त्यामधून सर्वसाधारण १५ मे नंतर उत्पादन मिळणार आहे.

आंबा काढणी

फेब्रुवारीअखेरीस कातळावरील बागांमध्ये पहिल्या टप्प्यातील आंबा काढणीयोग्य झाला होता. उन्हाचा तडाखा लक्षात घेत सकाळच्या सत्रात आंबा काढणी केली. जेणेकरून फळांचे उन्हापासून संरक्षण होईल.

आंबा काढल्यानंतर गवताच्या पेंढ्यामध्ये पिकविण्यासाठी ठेवले जातात. फळांना दर्जेदार नैसर्गिक पिवळा रंग आल्यानंतर तो विक्रीसाठी बाजारात पाठविण्यात येतात.

आंबे पेटी भरण्यापूर्वी फळांची प्रतवारी केली जाते. त्यामध्ये फळाचे वजन केले जाते. आठ डझनाच्या पेटीत १८१ ते २१० ग्रॅम, सात डझनाच्या पेटीत २११ ते २४० ग्रॅम, सहा डझनाच्या पेटीत २४१ ते २७५ ग्रॅम, पाच डझनाच्या पेटीत २७६ ते ३०५ ग्रॅमची फळे भरली जातात.

दरवर्षी सरासरी १२०० ते २००० पेटी आंबा उत्पादन मिळते. त्याला सरासरी १५०० ते १८०० रुपये इतका दर मिळतो.

दर्जेदार आंबा ग्राहकाला देण्यासाठी कलमांवरील आंबा डागमुक्त कसा राहील याचे नियोजन केले जाते.

मल्हार प्रमोद सावंत ७५८८९१८४७५

(शब्दांकन : राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com