Food Security Challenges: ‘एल निनो’मुळे पावसाचे प्रदेशनिहाय वितरण बिघडण्याचा धोका कायम असून, त्यातून अन्नधान्याच्या भाववाढीचा दबाव येऊ शकतो, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे. मात्र सरकारकडील धान्यसाठा भरपूर असल्याने आणि पुरवठ्याचे नियोजन सक्रिय असल्याने त्यातून दिलासा मिळू शकतो, असेही बँकेने ऑगस्टच्या मासिक बुलेटिनमध्ये नमूद केले आहे. .अपुऱ्या व असमान मॉन्सूनमुळे शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम शक्य आहे, आणि त्याचा ग्रामीण मागणीवरही परिणाम होऊ शकतो, असे बँकेचे मत आहे. कमी कालावधीची व हवामान बदल सहन करणारी पिके, पीक विविधीकरण तसेच पाणी साठवण व संवर्धनाच्या सरकारी उपायांमुळे हा परिणाम काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा बुलेटिनमध्ये व्यक्त करण्यात आली आहे..El Nino Threat: ‘एल निनो’चा ‘शॉक’ आधीच बसण्याची शक्यता; अमेरिकेतील संशोधन संस्थेचा अहवाल.किरकोळ महागाई जूनमध्ये ४.४ टक्क्यांवर गेली. सलग सोळा महिने ती उद्दिष्टाच्या आत राहिल्यानंतर ही वाढ झाली. जुलैमध्ये हा दर ४.४५ टक्के होता. अन्न व पेये गटातील भाववाढ मे व जूनमध्ये व्यापक स्वरूपाची होती. जूनमध्ये मांस, खाद्यतेल, फळे व मसाल्यांची भाववाढ ८ टक्क्यांहून अधिक होती, तर जुलैमध्ये मांस, अंडी व मसाल्यांची १२ टक्क्यांहून अधिक..अन्न, इंधन व अन्य निविष्ठांच्या दरवाढीचा परिणाम व्यापक महागाईत उतरण्याचा धोका कायम असल्याचे बुलेटिनमध्ये म्हटले आहे. २०२६-२७ साठी किरकोळ महागाईचा अंदाज ५.० टक्के असून दुसऱ्या तिमाहीत ४.७, तिसऱ्या तिमाहीत ५.९ आणि चौथ्या तिमाहीत ५.५ टक्के महागाई अपेक्षित आहे. पतधोरण समितीने रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे..धान्यसाठ्याची स्थिती मात्र भक्कम आहे. १ ऑगस्टला तांदळाचा साठा तिमाही बफर निकषाच्या ४.७ पट आणि गव्हाचा १.८ पट होता. पुरवठा वाढवण्यासाठी ३ जुलै रोजी सरकारने तांदूळ व गव्हासाठी खुल्या बाजार विक्री योजना जाहीर केली असून ती ३० जून २०२७ पर्यंत लागू राहणार आहे..El Nino Threat: ‘एल निनो’चा धक्का आणि धोका .धरणसाठा सरासरीच्या जवळ असणे ही जमेची बाजू असल्याचे रिझर्व्ह बँकेने नोंदवले आहे. केंद्रीय जल आयोगाच्या २० ऑगस्टच्या ताज्या अहवालानुसार देशातील १६६ प्रमुख प्रकल्पांतील उपयुक्त साठा ११७.७७३ अब्ज घनमीटर म्हणजे क्षमतेच्या ६४.१६ टक्के आहे. गेल्या वर्षी याचवेळी तो १४२.३४८ अब्ज घनमीटर होता. म्हणजे यंदाचा साठा गेल्या वर्षीच्या ८२.७४ टक्के आणि दहा वर्षांच्या सरासरीच्या ९७.०४ टक्के आहे..महाराष्ट्रातील ३५ प्रकल्पांत क्षमतेच्या ८९.९५ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ९२.०२ टक्के होते, तर दहा वर्षांची सरासरी ७६.६५ टक्के आहे. दक्षिण विभागात मात्र साठा ५६.२२ टक्क्यांवर आला असून गेल्या वर्षी तो ८१.५३ टक्के होता. उत्तर विभागातही तो ८३.७१ वरून ५७.०० टक्क्यांवर घसरला आहे. खरीप पेरा सामान्य क्षेत्राच्या ९२ टक्क्यांवर पोहोचल्याने शेती उत्पादनावरील जोखीम काहीशी कमी झाल्याचे बुलेटिनने म्हटले आहे. मात्र ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ९४ टक्क्यांहून कमी पाऊस पडेल, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज असल्याचा इशाराही त्यात आहे..ठळक बाबीधान्यसाठा व धरणसाठ्यामुळे दिलासा; महाराष्ट्रात ९० टक्के पाणीसाठा.अपुऱ्या आणि असमान मॉन्सूनमुळे शेती उत्पादनावर परिणाम शक्य.देशातील धरणसाठा क्षमतेच्या ६४.१६ टक्के; गेल्या वर्षीपेक्षा कमी, सरासरीच्या जवळ..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.