
Pune News : देशाच्या कृषी संस्थांमधील संशोधक व कृषी तज्ज्ञांच्या कार्याला मी वंदन करतो. पण, दुर्दैवाने तुमच्या संशोधनापासून शेतकरी वंचित आहेत. विद्वान व शेतकरी असे दोन वर्ग तयार झाले आहेत. तुमचे संशोधन बांधावर नेण्याचे आव्हान आपल्यासमोर उभे आहे, अशी खंत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केली.
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्स संस्थेच्या कृषी अर्थशास्त्र संशोधन केंद्राच्या (एईआरसी) अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजिलेल्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत ‘कृषी क्षेत्रातील शाश्वतता : समस्या, आव्हाने आणि धोरणात्मक सांगड’ यावर मंथन झाले. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष प्रा. विजय पॉल शर्मा, गोखले इन्स्टिट्यूटचे प्रभारी कुलगुरू प्रा. शंकर दास व कृषी अर्थशास्त्र संशोधन केंद्राच्या संचालिका प्रा.जयंती काजळे व्यासपीठावर होत्या.
श्री. चौहान म्हणाले की, कोविड काळात सर्व बंद पडलेले असताना केवळ शेतकऱ्यांनी देशाचे पालनपोषण केले. त्यामुळे शेतीकडे कधीही दुर्लक्ष करता येणार नाही.. तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीमधील उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवत देशाला पुढे जावे लागेल. आम्हाला देशातील धान्याची कोठारे भरायची आहेतच;
पण जगाची फुडबास्केटदेखील बनायचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने विचारपूर्वक धोरणात्मक बदल करते आहे. यापुढे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, रोबोटिक्स् याचा वापर वाढवला जाईल. परंतु, दुसऱ्या बाजूला मृदा आणि मानवाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कीटकनाशके व रासायनिक खतांचा समतोल वापर करण्याचे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही कृषिमंत्र्यांनी नमूद केले.
कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष प्रा. शर्मा म्हणाले, की देशाच्या कृषी व्यवस्थेतील अतिरिक्त मनुष्यबळ काढून कौशल्यआधारित कामे द्यावे लागतील. त्यासाठी गावपातळीवरच बिगर कृषी व्यवस्था उभारावी लागेल. या वर्गाला चांगली जीवनशैली व रोजगार द्यावा लागेल. तसे केले तरच ग्रामीण भागातील स्थलांतर थांबेल. कधीकाळी धान्य आयात करणारा देश आता तांदूळ, गहू व दुधाचे विश्वविक्रमी उत्पादन घेतो आहे.
शेतकरी व शास्त्रज्ञांनी हे घडविले असून ते अभिनंदनास पात्र आहेत. सरकारने उत्पादन वाढवारे आधीचे वर्षानुवर्षांचे धोरण बाजूला सारले आहे. आता कृषी व्यवस्थेचा अभ्यास केल्यास साडेतीन पटीने वाढली तर उत्पादन सहा पटीने वाढवले आहे. तांदूळ, गहू, दूध विक्रमी उत्पादन होत आहे. पीक उत्पादनवाढीपेक्षाही शेतकरी कल्याणाचे, त्यांच्या उत्पन्नवाढीचे ध्येय आता केंद्रस्थानी आले आहे. देशाच्या कृषी धोरण वाटचालीतील हा सर्वात मोठा व ऐतिहासिक बदल म्हणावा लागेल.’’
कुलगुरू प्रा. दास म्हणाले, ‘‘मोठी लोकसंस्था अद्यापही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यातून स्थलांतराचे प्रश्न वाढत आहे. स्थलांतर रोखण्यासाठी आधी शेती नफ्यात आणावी लागेल. त्याकरिता शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्र, ज्ञान व माहिती मिळवून देणारी बळकट व्यवस्था ग्रामीण भागात उभी करावी लागेल.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.