Nagpur News : दुष्काळ जाहीर करून मदत देण्यासंदर्भातील निकषात सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली.
शुक्रवारी (ता. २९) पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की दुष्काळी संहिता केंद्राकडून २०१६ मध्ये तयार करण्यात आली होती. ती आता जुनी झाली आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून यात काही बदल करण्यात येत आहे. पीकविमा व इतर मदत मिळण्यास शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे, त्यांना फायदा झाला पाहिजे, अशी मागणी कृषी तसेच मदत व पुनर्वसन विभागाची आहे.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी ट्रीगर १, २, ३ आहेत. या निकषात सुधारणा करण्यात येईल. त्यासाठी एक नवीन ड्राफ्ट तयार करण्यात येत आहे. सध्या याबाबत सांगता येणार नाही. हा ड्राफ्ट केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
नुकसानीचा प्रस्तावच नाही
जून-जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर विभागात ७१ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून, ६३ कोटी निधीची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव पंधरा दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यात आला.
परंतु नुकसानीच्या मदतीसंदर्भात कुठलाच प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. प्रस्ताव आल्यावर त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. वर्ष २०२२ मध्ये झालेल्या नुकसानासाठी १५०० कोटींची गरज होती. सातशे-साडेसातशे कोटी वितरित करण्यात आले असून, उर्वरित रक्कमही लवकरच देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.