Nagpur News : राज्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून, राज्य सरकारने आचारसंहिता शिथिल करून तातडीने टंचाई निवारणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (ता. २६) माध्यमांशी बोलताना केली.
लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची चिंता न करता राज्यातील पाणीटंचाईसह इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी खोचक टीकाही त्यांनी राज्य सरकारवर त्यांनी केली आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तलावांमध्ये केवळ ८ ते १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक तलावांनी तळ गाठला असून केवळ मृतसाठा शिल्लक आहे. फळबागांनासुद्धा टँकरने पाणी दिले जात आहे. राज्यात जेव्हा आमचे सरकार होते, त्या वेळी फळबागांसाठी टँकरने पाणी देण्यासाठी सरकार अनुदान दिले.
राज्यात चारा टंचाईचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आहे. यामुळे गोपालक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये चारा छावण्या सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्याने प्रशासनाला काम करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी अडचण होत आहे. राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे सरकारने आचारसंहिता शिथिल करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
नागरिकांच्या प्रश्नांवर पालकमंत्री गंभीर नाहीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगर येथे मराठवाडाच्या पाणीटंचाईबाबत आढावा बैठक ठेवली होती. यात पाच पालकमंत्री गैरहजर होते. यावरून हे सरकार सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर गंभीर नाही हे दिसून येते, अशी टीका या वेळी अनिल देशमुख यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.