
Mumbai News : माणसातील अहंकार हीच मोठी समस्या असून, अहंकारमुक्तीतूनच सुखाची अनुभूती होऊ शकते, असा उपदेश आध्यात्मिक गुरू, लेखक, जागतिक कीर्तीचे वक्ते श्री एम यांनी केला. पूर्वी ज्ञानप्राप्तीसाठी जगभरातील लोक भारतात येत होते. आज आपण मात्र परदेशात जातो. जग जेव्हा ज्ञानप्राप्तीसाठी पुन्हा भारताकडे वळेल, तेव्हाच आपण विश्वगुरू होऊ आणि भक्ती-शक्ती एकवटली तरच हे साध्य होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात रविवारी (ता. ९) सकाळी उपस्थित भाविकांना श्री एम यांच्या वाणीतून अनोखी आध्यात्मिक शिदोरी मिळाली. श्री एम यांच्या मार्गदर्शनानंतर ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘एपी ग्लोबाले’चे अध्यक्ष अभिजित पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
एक व्यक्ती काही करू शकत नाही, हे मी मान्य करणार नाही. एक व्यक्ती खूप काही करू शकते. बीज पेरणे आणि त्याचा वृक्ष होईपर्यंत योग्य पालनपोषण करणे, यालाच साधना म्हटले जाते. म्हणून कोणत्याही चांगल्या कामाचे बीज पेरणे गरजेचे आहे. परिवर्तन नक्की होईल आणि त्यातूनच आपला भूभाग स्वर्ग बनू शकतो. म्हणून सातत्याने कर्म करत राहा, असा सल्ला श्री एम यांनी तरुणांना दिला.
प्रत्येक माणसात परमेश्वराचा अंश असतोच. म्हणून तुमच्यात जी ऊर्जा आहे, त्याचा स्रोत सुरूच राहणार आहे. काम करत राहा, फक्त मीच ते काम केले किंवा माझ्यामुळे काम झाले असा भाव असणे गैर आहे. कुठल्याही कर्मामध्ये ‘मी’पणा असता कामा नये.
संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेतले. पाया पडलो आणि निघून गेलो, असे होता कामा नये. येथे ज्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत, त्या सर्व संत व सद्गुरूंनी सांगितलेले विचार व दिलेली शिकवण आत्मसात केली पाहिजे, असेही श्री एम या वेळी म्हणाले.
नदी सुधारणेमध्ये हवे सातत्य
नद्यांच्या प्रदूषणाबाबत श्री एम म्हणाले, की नदी सुधारणेचे काम हाती घ्यावेच लागेल. कोणतीही समस्या कायमस्वरूपी नसते; पण ती सुटायची असेल, तर त्यात सातत्य ठेवण्याची गरज आहे. नद्या पुन्हा प्रदूषित होऊ नयेत, यासाठी लोकांची मानसिकता बदलावी लागेल आणि हे सत्संगाच्या माध्यमातूनच होऊ शकते.
गुरूंचा शोध अन् गरज
‘कॉर्पोरेट गुरूं’बाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना श्री एम म्हणाले, की मी सद्गुरू किंवा गुरू आहे, असे खरे गुरू कधीच सांगत नाहीत. गुरूंबाबत आपल्या मनात एक ठरावीक रूप असते. खरा गुरू हा कोणत्याही स्वरूपात आपल्याला सापडू शकतो; पण ती दृष्टी आपल्याकडे असणे गरजेचे आहे. जीवनात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गुरूंची गरज असतेच. मनातून इच्छा असेल तर आपल्या डोक्यावर हात ठेवणारा गुरू निश्चित मिळू शकतो.
भक्ती अन् शक्ती
सर्वांमध्ये शक्ती असते; पण त्यात तामसी गुण असेल तर त्या शक्तीचा काही उपयोग नाही. शक्तीला सात्त्विक गुणाची जोड देणे गरजेचे आहे. भक्तीचे ‘उत्पादन’ होऊ शकत नाही. कारण भक्ती ही नैसर्गिक असते. ती आतून आली पाहिजे, असेही श्री एम म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.