Sangli News : दिघंची (साळसिंग मळा) येथील शिप्याचे लवण पाझर तलाव टेंभू योजनेच्या पाण्याने भरून द्यावा. या पाण्याचे बिल भरण्यास तयार आहोत, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी जलसंधारण विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र या मागणीकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तलावात अत्यल्प प्रमाणात पाणी सोडल्याने १५ दिवसांत तलाव कोरडा पडला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा, अन्यथा पाणीपट्टी भरणार नाही, अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
दिघंची येथे टेंभूच्या पाण्याचे बंद पाईपलाईनद्वारे आवर्तन सुरू आहे. दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात असल्याने साळसिंग मळा परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंधारण विभागाकडे शिप्याचे लवण तलाव भरून देण्याची मागणी लेखी अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी अत्यल्प पाणी सोडले. मात्र लगेच ते बंद केले. परिणामी त्याचा शेतकऱ्यांना काहीच लाभ झाला नाही. पंधरा दिवसांत पाणी आटल्याने तलाव कोरडा झाला आहे.
वास्तविक, या तलावामध्ये सोडलेल्या पाण्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे होते. मात्र ते अपूर्ण ठेवत अधिकाऱ्यांनी पाणी दुसऱ्या तलावात सोडले क्रमानुसार हा तलाव भरून नंतर दुसरा तलावात पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र तसेच झाले नाही. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्या वेळी तलाव भरला असल्याचा दावा टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र टेंभूचे पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना नियोजनाच्या अभावामुळे पाणी मिळत नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.